कल्याण-डोंबिवलीत रिक्षांमध्ये कोविड नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 01:18 AM2021-02-07T01:18:59+5:302021-02-07T01:19:07+5:30

आरटीओच्या बैठकीत ठरलं तरी काय?; दोनऐवजी तीन प्रवासी

On rickshaws in Kalyan-Dombivali | कल्याण-डोंबिवलीत रिक्षांमध्ये कोविड नियम धाब्यावर

कल्याण-डोंबिवलीत रिक्षांमध्ये कोविड नियम धाब्यावर

googlenewsNext

- अनिकेत घमंडी

डोंबिवली: रिक्षाचालकांच्या समस्यांसंदर्भात बुधवारी कल्याण येथे आरटीओ कार्यालयात बैठक पार पडली, त्या बैठकीत आता अनलॉकनंतर तीन सीट घेऊन कोविड आधीच्या पद्धतीने शेअर भाडे आकारण्यात यावे यावर चर्चा झाली, त्यास आरटीओ अधिकाऱ्यांनी लेखी मंजुरी दिलेली नाही. परंतु, तरीही प्रत्यक्षात मात्र शेअर असो की स्वतंत्र रिक्षाप्रवासाचे भाडे कमी न करताच दोन ऐवजी सर्रास तीन, चार प्रवासी घेऊन रिक्षावाहतूक सुरू आहे. आरटीओच्या दुर्लक्षामुळे कोविड नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार सुरू आहे.

तीन आसनी प्रवास सुरू करावा अशी प्रवाशांची मागणी असली तरीही त्यासोबत भाडेदेखील कमी व्हायलाच हवे, अशी मागणी प्रवाशांची आहे. यासंदर्भात आरटीओ ठोस भूमिका घेत नसल्याने आणि नियमांची कार्यवाही करत नसल्याने समस्या सुटत नसून तिढा वाढत असल्याचे नागरिकांसह रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रिक्षाचालकांच्या समस्यांसाठी आरटीओ बैठक बोलावते तशी प्रवाशांच्या समस्यांसाठी काय? घेतली नाही? असा सवाल त्रस्त प्रवाशांनी केला. कल्याण, डोंबिवली दोन्ही शहरांत काही रिक्षाचालक प्रवाशांशी उद्धट वर्तन करत असून त्यांच्यामुळे शहरात स्टेशन तसेच मोक्याच्या ठिकाणी वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्यामुळे आरटीओ आणि रिक्षा युनिनयन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेमकं ठरलं तरी काय? त्यातच संभ्रम असल्याने नियमांची पायमल्ली होत आहे.

डोंबिवली रेल्वे स्टेशन येथून पूर्वेला गांधीनगर येथे जाण्यासाठी कोरोना आधी स्वतंत्र रिक्षा केली तर २० ते २५ रुपये आकारले जात होते. परंतु, आता ते आकारण्यात येत नसून ४० रुपये, पन्नास रुपयेदेखील मागत असल्याचा अनुभव येत असल्याचे तेजस्विनी महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितले. शेअर पद्धतीने जाण्यासाठी दोन प्रवासी घेत नसून तीन प्रवासीच घेतात आणि भाडे मात्र दहा रुपयांऐवजी २० रुपये प्रत्येकी घेतात, हे काही सगळ्यांना परवडणारे नाही, ही प्रवाशांची लूट असून, कोरोनाचा फटका केवळ रिक्षाचालक घटकाला बसलेला नसून तो सगळ्यांना बसला आहे, याचा विचार केला जाणे गरजेचे आहे.

मीटरने प्रवास केला जात नाही म्हणूनदेखील प्रवासी हैराण आहेत. प्रोटेस्ट अगेंस्ट ऑटोवाला (पाम) या प्रवासी संघटनेचे प्रसाद आपटे यांनी सांगितले की ज्या प्रवाशांना मीटरने प्रवास हवा आहे त्यांना मीटर सुविधा मिळत नाही ही शहरांची शोकांतिका आहे. आरटीओ त्याबद्दल काहीच कारवाई करत नाही. वाहतूक पोलीस तक्रार करा, असे आवाहन करतात. सामान्य प्रवासी वाद नको म्हणून त्या विषयात खोलवर जात नाहीत. त्याचा फायदा घेऊन मनमानी सुरू असल्याची  टीका समाज माध्यमांवर होत आहे. लोकल सेवा सगळ्यांसाठी सुरू झाल्यानंतर आमच्या युनियनच्या सर्व सदस्यांना आम्ही तीन सीट घ्या आणि कोविड आधीचे शेअरचे भाडे आकारावे, असे आवाहन केल्याचे लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू काेमासकर यांनी सांगितले. 

रिक्षाचालकांच्या समस्यांसदर्भात आरटीओ कार्यलयात बैठकीत तीन आसन व कोविडआधीचे शेअरचे भाडे यासंदर्भात चर्चा झाली, त्यानुसार अजूनतरी सगळ्यानी कोविड नियमावलीच फॉलो करावी, असे सांगितले असून वाहतूक पोलिसांसमवेत सर्व्हे करून मग निर्णय घेण्यात येईल.
- तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

आरटीओच्या नियमावलीनुसार आम्ही रिक्षा चालवत आहोत, त्यांनी तीन आसनी व शेअर पद्धतीबाबत नव्याने मार्गदर्शन करावे, आम्ही त्याची अंमलबजवणी करू.
- संजय मांजरेकर, अध्यक्ष, रिक्षा संघटना

आरटीओच्या बैठकीत चर्चा झाली. परंतु, त्याची अंमलबजवणी मात्र अद्याप सुरू झालेली नसून ती जबाबदारी आरटीओची आहे.
- शेखर जोशी, उपाध्यक्ष, डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना

नुकतीच आरटीओ अधिकाऱ्यांमसवेत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार आम्ही तीन सीट व शेअर पद्धतीने कोविडआधीचे जुने भाडे घेण्याचे आवाहन केले आहे.
- दत्ता माळेकर, अध्यक्ष, वाहतूक सेल भाजप कल्याण जिल्हा

Web Title: On rickshaws in Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.