पुराचा फटका; कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २० लाख टन ऊस उत्पादन घटणार

By राजाराम लोंढे | Published: July 29, 2024 04:32 PM2024-07-29T16:32:59+5:302024-07-29T16:35:48+5:30

दूध घरात राहिल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

20 lakh tonnes of sugarcane production will decrease in Kolhapur district this year due to floods | पुराचा फटका; कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २० लाख टन ऊस उत्पादन घटणार

पुराचा फटका; कोल्हापूर जिल्ह्यात यंदा २० लाख टन ऊस उत्पादन घटणार

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जिल्ह्यात गेले सात-आठ दिवस झाले पुराचा विळखा असून, यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली असून, याचा सर्वाधिक फटका उसाला बसणार आहे. आगामी गळीत हंगामात किमान २० लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होणार आहे. शिरोळ, करवीर व कागल तालुक्यांतील साखर कारखान्यांना त्याची अधिक झळ बसणार असून, लाखो लिटर दूध घरात राहिल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे बसले आहे. त्यात हे दुसरे संकट उभे राहिले आहे.

गेले दहा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणे मोकळी होती, तोपर्यंत पुराची दाहकता दिसत नव्हती. पण राधानगरीसह सर्वच धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने पुराचे पाणी सैरभैर झाले. नदी, ओढ्याकाठची हजारो हेक्टर पिके बघता बघता पाण्यात गेली. गेले आठ दिवस ऊस, भात, सोयाबीन ही पिके पाण्याखाली आहेत. त्यांचे नुकसान होणार आहे. मागील २०२१ च्या महापुरात जिल्ह्यातील ७४ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. त्यावेळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्या तुलनेत यंदा क्षेत्र कमी असले तरी पाणी एकसारखे शिवारात राहिल्याने नुकसान अधिक होण्याचा धोका आहे.

जिल्ह्यात ६० हजार हेक्टरपैकी उसाचे किमान ४० हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली राहिल्याने किमान २० लाख टन उसाच्या उत्पादनावर परिणाम होणार, हे निश्चित आहे.

पंचनामे होणार, पण निकषाचे काय?

पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर ओसरल्यानंतरच सुरू होणार आहेत. शासनाच्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांनाच भरपाई मिळते. ऊस पाण्यातून बाहेर आल्यानंतर लगेचच नुकसानाला सुरूवात होत नाही. पंधरा दिवसानंतर त्याला फुटवे फुटतात, त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या सर्वच उसाला १०० टक्के भरपाई मिळणे गरजेचे आहे.

सोयाबीन थेट कुजायलाच सुरुवात

सोयाबीन पाण्याखाली गेले की ते लगेचच कुजण्यास सुरूवात करते. त्या तुलनेत भात पाच-सहा दिवस पाण्याखाली राहिले आणि त्यानंतर खताचा डोस दिला तर त्याचे किमान ५० टक्के नुकसान टाळता येऊ शकते.

दुधाचे ८० लाखांचे नुकसान

गेल्या सहा दिवसात ‘गोकुळ’सह इतर दूध संघांचे सुमारे १ लाख ७५ हजार लिटर दूध संकलन होऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसणार असून, उसाचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. - डॉ. अशोक पिसाळ

Web Title: 20 lakh tonnes of sugarcane production will decrease in Kolhapur district this year due to floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.