पाच तासांच्या तणावानंतर तिढा सुटला

By admin | Published: April 12, 2016 01:06 AM2016-04-12T01:06:31+5:302016-04-12T01:07:15+5:30

तीन बैठकांनंतर निर्णय : आरोप-प्रत्यारोपामुळे तणाव; दोन्ही बाजूंच्या दहा महिलांना प्रवेश; ओटी भरून अखेर गाभारा प्रवेशावर पडदा

After five hours of stress, | पाच तासांच्या तणावानंतर तिढा सुटला

पाच तासांच्या तणावानंतर तिढा सुटला

Next

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन प्रवेशासंबंधी स्त्री-पुरुष समता समिती व अंबाबाई भक्त मंडळ व टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्त्यांमध्ये आज, सोमवारी विठ्ठल मंदिर झालेल्या पहिल्या बैठकीच्या वादानंतर अखेर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंच्या पाच-पाच महिलांना प्रवेश देण्याचे ठरले. त्यानुसार एकूण सात महिलांनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात जावून देवीची ओटी भरून रितसर प्रवेश केला. तब्बल पाच तासांच्या बैठकीनंतर हा तिढा तात्पुरता सुटला.
काल (रविवारी) ठरल्याप्रमाणे स्त्री-पुरुष समता समिती, अंबाबाई भक्त मंडळ आणि टोलविरोधी कृती समितीमध्ये मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरात अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यासंबंधी चर्चा झाली. टोलविरोधी कृती समितीतर्फे निवासराव साळोखे यांनी प्रथम महिलांना मंदिरात किंवा देवीच्या गाभाऱ्यात जाण्यास आपल्या समितीचा वा सदस्यांचा विरोध नसल्याचे जाहीर केले. त्यामध्ये कोल्हापूरची शांतता भंग होऊ नये, याकरीता आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपण अर्थात भक्त मंडळाने शनिशिंगणापूरची तुलना अंबाबाई देवीशी करू नये.
भूमाताच्या तृप्ती देसाई यांनी येऊन येथे प्रवेश करावा आणि आपण फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये, असे सांगितले. त्यावर भक्त मंडळातर्फे सतीशचंद्र कांबळे यांनी अंबाबाई देवीचे पावित्र्य राखून पोलिस संरक्षणात आमच्या महिलांना गाभारा प्रवेश द्यावा, अशी विनंती सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीला केली.
त्यावर पुन्हा साळोखे यांनी गाभारा प्रवेशप्रश्नी करवीरनगरीचे वातावरण गढूळ झाले आहे. त्याबद्दल आपण सर्व काय भूमिका घेणार आहात, अशी विचारणा केली.
प्रथम दोन्ही बाजूंच्या दहा-दहा महिलांना प्रवेश द्यावा, असे भक्त मंडळातर्फे सुचविण्यात आले.
या दरम्यान टोलविरोधी कृती समितीच्या दीपा पाटील बोलण्यास उभ्या राहिल्या. त्यांनी भक्त मंडळाच्या महिलांकडे आपण कधी सत्यनारायणची पूजा घातली आहे का, असा मुद्दा उपस्थित करत वादाला तोंड फोडले. त्यामध्ये सुवर्णा तळेकर व दीपा पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याचवेळी भक्त मंडळाच्या सुनंदा मोरे यांनी दिवसातून दहा महिलांना गाभारा प्रवेश देण्यासंबंधी मुद्दा मांडला.
या मुद्द्याला सर्वांनी विरोध केला. दोन्ही बाजूंकडून आपलाच मुद्दा खरा म्हणून जोरजोरात ओरडण्यास आणि गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. त्यामुळे टोलविरोधी कृती समितीचे साळोखे, रामभाऊ चव्हाण, सुरेश जरग, श्रीकांत भोसले, बाबा पार्टे आदी मंडळी बैठकीतून निघून गेली. त्यानंतर पुन्हा बैठकीच्या ठिकाणावरून बाहेर जात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. त्यामुळे दोन तासांनंतर अखेर ही बैठक निष्फळ ठरली. दुपारी दोन वाजता पुन्हा विठ्ठल मंदिराशेजारी मुनिश्वर वाड्यात पुन्हा दीपा पाटील, रामभाऊ चव्हाण, बंडा साळोखे, सुनील घनवट, बाबा पार्टे, महेश उरसाल, रमेश मोरे, तर भक्त मंडळातर्फे सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव यांच्यात बैठक झाली. यावेळी भक्त मंडळाच्या १९ महिलांना गाभाऱ्यात प्रवेश करू द्या, असे कांबळे व यादव यांनी मागणी केली. दोन तास चाललेल्या या बैठकीत सव्वाचार वाजता रामभाऊ चव्हाण यांनी ‘आमचे नको, तुमचेही नको म्हणत मंदिरात सुरक्षेसाठी असलेल्या ५ महिलांना गाभाऱ्यात जाऊ द्यावे आणि प्रतीकात्मक प्रवेश करून दर्शन घेऊन द्यावे,’ असे सुचविले. त्यावर कांबळे, यादव यांनी विरोध करत तुमच्या ५ आणि आमच्या ५ महिलांना प्रवेश द्यावा, असा आग्रह धरला. हा आग्रह मान्य नसल्याने पुन्हा ही बैठक निष्फळ ठरली. यावेळी पोलिसांच्यावतीने जुना राजवाडा येथे दोन्ही बाजू्च्या महिला व पुरुष मंडळींना चर्चेकरीता पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी पाचारण केले. येथेही तासाभराच्या चर्चेनंतर कायदा व परिस्थितीचा नेमका अंदाज घ्या आणि कोल्हापूरची शांतता भंग होऊ नये, याकरीता सर्वांनी प्रयत्न करा, अशी विनंती देशमुख यांनी केली. त्यावरही काही काळ चर्चा झाली; ‘होय’, ‘नाही’ करत दोन्ही बाजंूकडून दहा महिलांना प्रवेश देण्याचे ठरले. त्यानुसार सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी भक्त मंडळातर्फे स्नेहल कांबळे, सीमा पाटील, सुवर्णा तळेकर, आरती रेडेकर, रुपाली कदम, तर टोलविरोधी कृती समितीतर्फे दीपा पाटील, वैशाली महाडिक यांनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून ओटी भरली आणि अखेर गाभारा प्रवेशावर पडदा पडला.


प्रतिनिधीक स्वरूपात सात महिलांनी गाभारा प्रवेश केल्याच्या प्रकरणाची मंदिराबाहेर चर्चा सुरू होती. त्यातील काही महिला प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या. यातच मुंबईहून दर्शनासाठी आलेल्या वैजयंती देशपांडे व स्नेहा खरे या भाविकांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश करून स्त्री-पुरुष समानता साधण्याऐवजी कर्तृत्वाच्या माध्यमातून समानता साधावी, अशी प्रतिक्रिया देशपांडे व खरे यांनी व्यक्त केली.
मोबाईलमध्ये छबी टिपण्यासाठी गडबड
प्रातिनिधीक स्वरूपात गाभारा प्रवेश करण्यासाठी महिला येत असल्याचे समजताच मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी अन्य भाविकांना पितळी उंबऱ्याबाहेर थांबविले. संबंधित महिला पितळी उंबऱ्यातून आत येताच उपस्थितांपैकी काहीजणांकडून त्यांच्या गाभारा प्रवेशाचा क्षण मोबाईलबद्ध करण्यासाठी गडबड सुरू झाली.

श्रेयवाद पुन्हा रंगला
स्त्री-पुरुष समता समिती व अंबाबाई भक्त मंडळाच्या सीमा पाटील यांनी करवीरनिवासीनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात आम्हा कोल्हापूरकर महिलांनाच द्या. कारण बाहेरील भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसार्इंच्या नावे गाभारा प्रवेशाचे तिकीट फाडू नये तर टोलविरोधी कृती समितीच्या दीपा पाटील यांनी कोण तृप्ती देसाई असा सवाल प्रसारमाध्यमांकडे केला. एका कार्यकर्त्याने तर आपली पत्नी केवळ अंबाबाईच्या गाभाऱ्यात जायला मिळते म्हणून या आंदोलनात प्रथमच आली आहे. त्यामुळे तिचेही नाव यात घ्या, असे सांगितले. प्रथम बैठकीत एकमेकांविरोधात तुम्ही कधी सत्यनारायण पूजा घातली का, म्हणणाऱ्या व त्याला विरोध करणाऱ्या अशा दोन महिलांनीही गाभाऱ्यात एकत्र प्रवेश केला.


करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दर्शन घेणाऱ्या महिलांचे प्रथम अभिनंदन. या नारीशक्तीच्या विजयाबद्दल आम्ही आंदोलन करणार नाही; पण उद्या, बुधवारी ताराराणी चौकातून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरापर्यंत रॅली काढू. अंबाबाई मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यात जावून सन्मानाने आई अंबाबाईचे दर्शन घेऊ. यावेळी दोनशे महिला या रॅलीत सहभागी होतील. जादा महिला आणून आमच्या पोलिसबांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही.
- तृप्ती देसाई, अध्यक्षा, भूमाता ब्रिगेड

गाभारा प्रवेशावरून दोन मतप्रवाह होते. त्यात जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधिन राहून या प्रवेशाबाबत आम्ही संयमी व सामंजस्याची भूमिका घेतली. सर्वपक्षीय संघटनांना एकत्रित करून शांततेत गाभारा प्रवेशाचा प्रश्न सोडविला.
- अनिल देशमुख
पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा

Web Title: After five hours of stress,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.