शिरोळमध्ये महावितरणवर अंकुशचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:02+5:302021-02-06T04:44:02+5:30
जयसिंगपूर : लॉकडाऊनमधील वीज बिले माफीबाबत सरकार आणि महावितरणने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी ...
जयसिंगपूर : लॉकडाऊनमधील वीज बिले माफीबाबत सरकार आणि महावितरणने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी बैलगाडीतून सुमारे दहा हजार तक्रारी अर्ज शिरोळ महावितरणकडे देण्यात आले.
धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकातून आंदोलनास सुरुवात झाली. कोरोना कालावधीत शासनाच्या आदेशाने उद्योग, दुकाने बंद होती. यामुळे अनेक व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. सरकारने वीज बिले माफ करण्याचे जाहीर केले होते. एप्रिल, मे, जून या महिन्यातील स्थिर आकार माफ करण्याचेही सांगितले होते. एकीकडे शासनाचा निर्णय होत नसताना दुसरीकडे वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा ग्राहकांना दिल्याने संताप व्यक्त होत आहे. लॉकडाऊन काळात झालेली वीज दरवाढ रद्द करण्यात यावी. चुकीची वीज बिले दुरुस्त करावीत. शासन वीज बिलाबाबत निर्णय घेणार आहे, त्याआधीच वीज बिल भरा, अशी जबरदस्ती खपवून घेणार नाही. मागण्यांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत थकीत वीज बिल भरणार नाही. तक्रारीची दखल न घेतल्यास वीज कायद्यानुसार ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आंदोलनात राकेश जगदाळे, सत्यजित सोमण, अभिजित पाटील, रघुनाथ पाटील, प्रभाकर बंडगर, भूषण गंगावणे, श्रीकांत माने-गावडे, उदय होगले, प्रकाश बावडेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो - ०५०२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ -
शिरोळ येथे आंदोलन अंकुशच्या वतीने महावितरणला तक्रारी अर्ज देण्यात आले.