‘ब्रिस्क’ने गडहिंग्लज कारखाना सोडू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:22 AM2021-02-08T04:22:11+5:302021-02-08T04:22:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : ‘ब्रिस्क’ कंपनीने कारखाना उत्तमप्रकारे चालवला आहे. ‘एफआरपी’प्रमाणे ऊस बिले, तोडणी वाहतूक बिले, कामगारांचा पगार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : ‘ब्रिस्क’ कंपनीने कारखाना उत्तमप्रकारे चालवला आहे. ‘एफआरपी’प्रमाणे ऊस बिले, तोडणी वाहतूक बिले, कामगारांचा पगार व बोनसदेखील वेळेत दिला आहे. त्यामुळे कंपनीने कारखाना सोडू नये, अशी विनंती गडहिंग्लज साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना आज (रविवारी) दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, १२ मे २०१८पासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांना कारखान्यात न सोडणे, कंत्राटदारांना मेटेनन्स करू न देणे-हाकलून देणे, मोर्चे काढणे, गेटवर सभा घेऊन कंपनीची बदनामी करणे इत्यादी गोष्टीमुळे कंपनी व्यथित झाली आहे, असे आपण म्हणाला आहात. परंतु, त्यामध्ये सेवानिवृत्त कामगारांचा कोठेही सहभाग नाही.
गेल्या २५ दिवसांपासून सेवानिवृत्त कामगारांनी प्रांत कचेरीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे कंपनी कारखाना सोडून जात आहे, असा अपप्रचार काहीजण करत आहेत. त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे कंपनीच्या काळातील फायनल पेमेंट, ग्रॅच्युईटी, वेतन फरक इत्यादी संपूर्ण देणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ८ टक्के व्याजासह लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती या कामगारांनी केली आहे. या निवेदनावर चंद्रकांत बंदी, सुभाष पाटील, बाळासाहेब मोहिते, लक्ष्मण देवार्डे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.