सोईच्या राजकारणाने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत
By admin | Published: May 6, 2016 12:38 AM2016-05-06T00:38:40+5:302016-05-06T01:11:18+5:30
उत्तूर-मडिलगे गट : काँगे्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे पक्षनिष्ठेला तडा; मनधरणीसाठी नेत्यांचे प्रयत्न
रवींद्र येसादे --उत्तूर --आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेत्यांच्या सोईच्या राजकारणामुळे काँगे्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असल्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पं. समिती निवडणुकांत जबर फटका राजकीय पक्षांना बसणार आहे. कार्यकर्त्यांची उत्तूर-मडिलगे गटात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
उत्तूर-मडिलगे गटातून अशोक चराटी यांच्या महाआघाडीने उमेदवारी जाहीर करून कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकले आहे. राष्ट्रवादीचे कारखान्याचे संचालक मारुती घोरपडे यांनी महाआघाडीतून उमेदवारी घेतली आहे. आमदार मुश्रीफ यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली होती; मात्र आमदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे उमेदवारी घेतली. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चलबिचल निर्माण झाली असून, तीच अवस्था मडिलगे येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते के. व्ही. येसणे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी महाआघाडीची उमेदवारी घेतली.
येसणे हे चराटी यांच्याबरोबर, तर शिंपी यांच्या गटातून राष्ट्रवादी, काँगे्रस आघाडीतून उपसभापती दीपक देसाई, माजी सभापती भिकाजी गुरव, माजी संचालक जाधव हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीकडून उमेदवारांचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे.
उत्तूर गटातून महाआघाडीतून विश्वनाथ करंबळी, महिला गटातून नर्मदा सावेकर यांची नावे जाहीर झाल्याने प्रचार सुरू केला आहे. रवींद्र आपटे यांच्या मार्गदर्शनातून कारभार सुरू आहे. राष्ट्रवादी व काँगे्रसमधून वसंतराव धुरे यांचे नाव निश्चित आहे. उर्वरित जागेसाठी जि. प. सदस्य उमेश आपटे, त्यांच्या पत्नी वैशाली आपटे, जि. प. माजी सदस्य काशीनाथ तेली यापैकी दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत आमदार मुश्रीफ यांनी तेली यांना शब्द दिला होता म्हणे? अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे.
ही निवडणूक पक्षनिष्ठेला तडा जाणारी आहे. याचे पडसाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर होणार आहेत. गतवेळच्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न महाआघाडीतील विश्वनाथ करंबळी यांच्याकडून केला जाणार आहे. मागील जि. प. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी उमेश आपटे यांना मदत केली होती. तीच पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने महाआघाडी प्रयत्न करणार आहे; मात्र उमेश आपटे यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने महाआघाडीही पेचात आहे. राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने फुटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही महाआघाडीतून उमेदवारी घेतली असली तरी आमदार मुश्रीफ यांचे आम्हाला वावडे नाही, अशी भूमिकाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून केली जात आहे. त्यामुळे आम्ही पक्षातून बाजूला गेलो असे नव्हे, असेही सांगितले जाते.
काँगे्रसमध्येही तीच अवस्था आहे. पी. एन. पाटील यांना मानणारा रवींद्र आपटे यांचा गट आहे, तर आमदार सतेज पाटील यांना मानणारा गट आजरा तालुक्यात आहे. काँगे्रस नेमकी कुणाची पी. एन, सतेज पाटील की महादेवराव महाडिक यांची अशी अवस्था ही काँगे्रसच्या गोटातील कार्यकर्त्यांची झाली आहे. महाआघाडीचे उमेदवार ठरले असले तरी काँगे्रस-राष्ट्रवादी उमेदवारी माघारीपर्यंत ताणले जाणार आहेत. उत्तूर-मडिलगे गटातून राष्ट्रवादीचे चंद्रकांत गोरुले, गोविंद सावंत, महादेव पाटील, शिरीष देसाई यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
जिल्हा बँकेच्या ठरावावेळी राष्ट्रवादीचे ठराव चराटी यांच्याकडे गेले होते. त्या मंडळीशी संघर्ष सुरू आहे. आमदार मुश्रीफ नेमकी कोणती भूमिका घेणार की, सोयीचे राजकारण करणार यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असून, जनता दलाचे सदानंद व्हनबट्टे, भाजप सरचिटणीस श्रीपती यादव हे महाआघाडीबरोबर राहणार आहेत.