संसर्गाला परतावण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:10+5:302021-06-05T04:19:10+5:30
कोल्हापूर : रोज भाजीपाला खरेदीसाठी अथवा किरकोळ कारणांसह विनाकारण फिरून संसर्ग वाढवू नये. अत्यावश्यक कारण असेल तरच बाहेर पडावे, ...
कोल्हापूर : रोज भाजीपाला खरेदीसाठी अथवा किरकोळ कारणांसह विनाकारण फिरून संसर्ग वाढवू नये. अत्यावश्यक कारण असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा शेवटच्या टप्प्यातही मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल. संसर्गाची लाट रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी केले.
पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. पोलीस कर्मचारी चोवीस तास रस्त्यावर बंदोबस्त करीत आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातून एक लाख लोकांनी प्रशासनाने घातलेली नियम पायदळी तुडवली आहे. अशा लोकांवर कारवाई करीत पोलिसांनी कोट्यवधीचा महसूल दंड रूपाने गोळा केला आहे. तरीसुद्धा अगदी दोन टक्के लोक रोज भाजीपाला खरेदी व अन्य छोट्या कारणांसाठी रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाची पाॅझिटिव्हिटी कमी होत नाही. रोज १५०० च्या आसपास रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी इतके दिवस संयमाने काढले आहे. हा संयम यापुढेही कायम ठेवून दुसरी लाट थोपविण्याचे काम करावे. घरात बसूनच आतापर्यंत जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे. यापुढेही संयम बाळगून सहकार्य करावे. जे लोक यापुढेही विनाकारण फिरतील त्यांच्यावर पोलीस दल कडक कारवाई करेल, असेही पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी स्पष्ट केले.