पानसरे हत्येप्रकरणी रोज आढावा बैठक
By admin | Published: September 19, 2015 12:36 AM2015-09-19T00:36:53+5:302015-09-19T00:38:24+5:30
संजय वर्मा : पोलीस महासंचालकांचे ‘आयजीं’ना आदेश
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी ‘सनातन’चा पूर्णवेळ काम करणारा संशयित समीर गायकवाड याला अटक केली आहे. या हत्येच्या तपासाचा रोज आढावा घेऊन माहिती देण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिले आहेत. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात तपास अधिकाऱ्यांची शुक्रवारपासून आढावा बैठक घेत असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास वर्मा यांनी अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांची बैठक घेऊन तपासाबाबत आढावा घेतला.
पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याने संशयित समीर गायकवाड याला अटक केली. त्यानंतर त्याच्या मुंबईतील प्रेयसीसह संकेश्वर येथील नातेवाइकांना ताब्यात घेतले. गेले तीन दिवस या प्रकरणी तपासप्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार संशयितांकडे चौकशी करीत होते. या हत्येप्रकरणी काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या संदर्भात तपास अधिकाऱ्यांची रोज आढावा बैठक घेऊन तिचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्याचे आदेश पोलीस महासंचालक दयाळ यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी काही तपास अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पानसरे हत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती देता येत नाही. ती गोपनीय आहे. आम्ही शेवटपर्यंत तुम्हाला तपासाबाबत काही सांगू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)