दळप-कांडपच्या थकीत वीज बिलाबाबत निर्णय घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:42+5:302021-03-13T04:44:42+5:30
भोगावती : कोरोना काळातील दळप-कांडप व्यावसायिकांचे थकीत वीज बिलाबाबत राधानगरी महावितरणने ३० टक्के रक्कम भरण्याचा तोडगा काढला होता. त्यानुसार ...
भोगावती : कोरोना काळातील दळप-कांडप व्यावसायिकांचे थकीत वीज बिलाबाबत राधानगरी महावितरणने ३० टक्के रक्कम भरण्याचा तोडगा काढला होता. त्यानुसार तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी ३० टक्के रक्कम भरली आहे. सध्या वायरमनकडून वीज बिलाची सर्व रक्कम भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. हा तगादा थांबवावा अन्यथा संघटनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष संजय फासके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
राधानगरी तालुक्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी पहिली गरज असणाऱ्या अन्न प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या दळप-कांडप व्यावसायिकांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा दिली आहे. या काळात अनेक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटल्याने अनेक वेळा दळप मोफत द्यावे लागले. असे असतानाही शासन वीज बिलाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही हे दुर्दैवी असल्याचे फासके यांनी म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार गिरण चालक-मालकांचा हा प्रश्न आहे, यासाठी संघटना सोमवार दि. १५ रोजी आ. प्रकाश अबीटकर यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. या निवेदनावर शिवाजी पाटील, सयाजी संकपाळ, मनोज कानकेकर, दिलीप पाटील, सचिन संकपाळ, मोहन पाटील, प्रवीण पाटील, सदाशिव खडके यांच्या साह्य आहेत.