ग्रामसभांबाबत उद्या निर्णय होणार - हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:20+5:302021-02-08T04:21:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे ग्रामसभांचा कामकाज ठप्प आहे, मात्र शेतकरी संघटनांसह इतर पक्षांनी ग्रामसभांबाबत मागणी केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे ग्रामसभांचा कामकाज ठप्प आहे, मात्र शेतकरी संघटनांसह इतर पक्षांनी ग्रामसभांबाबत मागणी केली आहे. याबाबत उद्या, मंगळवारी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिली.
कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाऊन केले होते. त्यानंतर टप्या-टप्याने लॉकडाऊन शिथील केल्याने जनजीवन पूर्ववत सुरू झाले. मात्र, गर्दी होऊ नये, यासाठी मोठ्या सभा, कार्यक्रमांना नियमावली घालून दिली होती. मात्र, ऑक्टोबरपासून राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत गेला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर ग्रामपंचायतीसह सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे ग्रामसभा सुरू कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी आपणास भेटून केली. आता कोरोनाचा संसर्ग कमी होत चालला आहे. त्यामुळे ग्रामसभा घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन आपण संबंधितांना दिल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. त्यानुसार उद्या, मंगळवारी ग्रामसभांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.