..तरी शरद पवार यांची भीती का वाटते, जाणीवपूर्वक प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:56 IST2025-01-27T12:56:12+5:302025-01-27T12:56:47+5:30
मोठा विजय मिळूनही पवार यांची भीती का वाटते

..तरी शरद पवार यांची भीती का वाटते, जाणीवपूर्वक प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न - जयंत पाटील
कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांना शरद पवार यांचा मोठा आधार होता. त्यांनी एफआरपी, इन्कमटॅक्ससह अनेक प्रश्ननांवर तोडगा काढण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या मनात पवार यांच्याविषयी आदराची भावना आहे. मात्र, सध्याच्या स्थितीला त्यांची ही प्रतिमा जाणीवपूर्वक डागळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.
जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या कृषी मंत्रिपदाच्या काळात शेतकऱ्यांना मोर्चा काढावा लागला नाही. सध्या मात्र, कृषिमंत्री कोण आहे याची अनेकांना माहिती नाही. पवार यांना वारंवार जेवढे टार्गेट केले जात आहे. मात्र, जितके टार्गेट कराल तेवढे त्यांच्यासोबत मराठी माणूस एकत्र येईल. इतका मोठा विजय मिळूनही पवार यांची भीती का वाटते, असा सवालही त्यांनी केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, आर.के. पोवार उपस्थित होते.
सवलतीच्या पैशाच्या वसुलीसाठीच दरवाढ
एस. टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली, पण या सवलतीचे पैसे भाड्यात वाढ करून सरकारने भरपाई सुरू केली असून, दरवाढ न करता तिजोरीतून हे पैसे द्यावेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
गुंतवणूक कागदारवर राहू नये
दावोसमध्ये मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी राज्यासाठी १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे, याचे स्वागत करतो. हे सर्व भारतातीलच गुंतवणूकदार आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारी आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर कारखाने सुरू करावेत व बेरोजगार युवकांना संधी द्यावी. ही गुंतवणूक कागदावरच राहू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बदली होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करणार
पक्षात काही बदलाचे वारे सुरू आहे, हे मला माहीत नाही. मात्र, बदली होणाऱ्या अधिकाऱ्याला बदल होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करायचे असते. मी बदलीच्या प्रतीक्षेत नाही, ज्यावेळी बदली होईल, त्यावेळी बघू असे सांगत तूर्तास प्रदेशाध्यक्षपद बदलणार नसल्याचे संकेत आमदार पाटील यांनी दिले.
सहपालकमंत्रिपदाला अर्थ नाही
शक्तीपीठ महामार्गात छोटे शेतकरी भरडले जाणार असल्याने महामार्गाला लोकांचा विरोध आहे. सहपालकमंत्री हे पदच नाही. भाजपचा आग्रह असल्याने ही पदे भरली असली तरी त्याला काही अर्थ नसल्याचा टोला पाटील यांनी लगावला.