स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची टिंगलटवाळी नको

By Admin | Published: May 1, 2016 01:01 AM2016-05-01T01:01:54+5:302016-05-01T01:01:54+5:30

प्रा. एन. डी. पाटील यांची भूमिका : पश्चिम महाराष्ट्राने अधिक सामंजस्य दाखवावे

The demand for separate Vidarbha is not tingalwali | स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची टिंगलटवाळी नको

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची टिंगलटवाळी नको

googlenewsNext

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
स्वतंत्र्य विदर्भाच्या मागणीची इतर प्रदेशांनी टिंगलटवाळी करू नये. कुटुंबात काही वाद निर्माण झाल्यास मोठ्या भावाने जशी सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित असते, तशीच भूमिका या वादात पश्चिम महाराष्ट्राने घ्यावी व त्यांना या मागणीपासून परावृत्त करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले. सत्ताधारी भाजपला विदर्भातून चांगले राजकीय पाठबळ मिळाले असल्याने ते वेगळ््या विदर्भाचा जुगार खेळतील, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रिय असलेले व आताही बेळगाव, खानापूर, निपाणी, कारवारसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ झाला पाहिजे या मागणीसाठी एकाकीपणे झुंज देणारे प्रा. पाटील यांची महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने भेट घेतली. अलीकडील काही दिवसांत वेगळ््या विदर्भाच्या मागणीचा जोर वाढला असल्याने या मागणीचे नेमके काय होऊ शकेल, यासंबंधी चर्चा केली.
प्रा. पाटील म्हणाले, ‘विदर्भाकडे महाराष्ट्राचे अधिक काळ मुख्यमंत्रिपद होते, मग तुमचा विकास तुम्ही का करून घेतला नाही, अशी भूमिका अलीकडील काळात अनेकजण मांडत आहेत; परंतु ती चुकीची आहे. मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. तो एका प्रदेशाचा असत नाही. जरी मुख्यमंत्री विदर्भातील नेत्याकडे असले, तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर सुरुवातीपासूनच पश्चिम महाराष्ट्राचा प्रभाव राहिला आहे. तिथे मुख्यत: विकासाच्या अनुशेषाचा मोठा प्रश्न आहे. योग्य प्रश्नांची योग्य उत्तरे दिली पाहिजेत. दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या पोलादी पुरुषाच्या पाटण तालुक्यात आजही अनेक गावे विजेपासून वंचित आहेत. शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातही अनेक गावे आज पाण्याने तहानलेली आहेत. मग हाच निकष तुम्ही त्यांच्याबाबतीत लावणार का, हा खरा प्रश्न आहे. प्रत्येकजण आपला दोष झाकण्याचा प्रयत्न करीत आहे.’
विदर्भ असो की मराठवाडा, जे त्यांच्या वाट्याचे आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे असा आग्रह धरून प्रा. पाटील म्हणाले, ‘मागे एकदा उजनी धरणातून मराठवाड्याच्या हिश्श्याचे २८ टीएमसी पाणी देण्याचा वाद निर्माण झाला होता. असे पाणी दिलेच पाहिजे यासाठी मी स्वत: बीडमध्ये जाऊन परिषद घेतली होती. त्यावेळी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी त्यास जोरदार विरोध केला होता व पाणी दिल्यास रक्ताचे पाट वाहतील, अशी भूमिका घेतली होती. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या अंगात मुबलक पाण्यामुळे जरा जास्तच रक्त वाहत आहे. त्यांनी आपल्याच राज्यातील तहानलेल्या बांधवांचाही माणुसकीच्या भावनेतून विचार करावा, असा आग्रह आम्ही धरला होता.’
भाषिक राज्यांची निर्मिती झाली तेव्हा फाजल अली कमिशनने वेगळ््या विदर्भाची तरतूद केल्याचे सांगून प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, ‘त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे, त्याआधारे आम्ही स्वयंपूर्ण होऊ शकतो, असे त्या प्रदेशातील नेत्यांना वाटते; परंतु ही संपत्ती शाश्वत नाही. तिचा शंभर वर्षांनी का असेना साठा संपेल. जनमत चाचणी हा देखील भावनिक विषय होऊ शकतो. नुसत्या भावनेच्या आधारे या प्रश्नांकडे पाहिले जाऊ नये. आतापर्यंत जांबुवंतराव धोटे, बनवारीलाल पुरोहित, आदी नेत्यांना वेगळ््या विदर्भाच्या मागणीवर आपले पुढारीपण टिकविता आलेले नाही’.

Web Title: The demand for separate Vidarbha is not tingalwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.