तीन शासकीय कार्यालयातील पाणीपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:10+5:302021-02-05T07:17:10+5:30
कोल्हापूर : शहरातील रेल्वे विभाग, समाज कल्याण, विभागीय वन या शासकीय कार्यालयांकडील लाखो रुपये थकबाकी भरणा न केल्यामुळे ...
कोल्हापूर : शहरातील रेल्वे विभाग, समाज कल्याण, विभागीय वन या शासकीय कार्यालयांकडील लाखो रुपये थकबाकी भरणा न केल्यामुळे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातर्फे त्यांचे नळ कनेक्शन बुधवारी खंडित करण्यात आले. तर आयटी पार्कची थकबाकी असल्याने सोमवारीच त्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले.
पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीपट्टी वसुली धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बुधवारी रेल्वे विभागाकडील चार कनेक्शन, समाज कल्याण कार्यालयाचे एक कनेकशन, विभागीय वन कार्यालय यांचे एक कनेक्शन, आयटी पार्क यांचे एक कनेक्शन खंडित करण्यात आले.
ही कारवाई प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता नारायण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वसुली पथक प्रमुख मोहन जाधव, मीटर रीडर रमेश मगदूम, फिटर तानाजी माजगावकर, वसंत ढेरे यांनी भाग घेतला.
- शासकीय कार्यालयाकडील थकबाकी- सीपीआर कार्यालय (८,४२,०२,२२७ ), १२ ग्रामपंचायती (६,९४,६४,९२७), रेल्वे विभाग (२,०५,५३,१८८), पाटबंधारे, वारणा विभाग (९८,५९,७३१), सार्वजनिक बांधकाम कार्यालय (७१,७७,४६१), शिवाजी विद्यापीठ कार्यालय (६६,३८,६९६ ), पाटबंधारे पंचगंगा (६३,०५,९३३), जिल्हाधिकारी कार्यालय (२४,८९,०८१), सीपीआर अधिष्ठाता (२०,२३,९३७), जिल्हा परिषद कार्यालय (१८,५३,३१२), टेलिफोन विभाग (१६,१७,३६१).
शासकीय कार्यालये व अन्य शासकीय कार्यालयाकडील सुमारे २१ कोटींची थकबाकी असून, ती थकीत त्वरित भरण्याबाबत पाणीपुरवठा कार्यालयाकडून यापूर्वी वारंवार लेखी नोटीस देण्यात आली आहे. तसेच बलकवडे यांनी संबंधित विभागप्रमुख यांना अर्धशासकीय पत्र देण्यात आले आहे. जर संबंधित कार्यालयांनी थकीत रक्कम भरणा केला नाही तर पाणी कनेक्शन खंडित करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.