Kolhapur: राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, ८५४० क्यूसेक विसर्ग सुरु; पंचगंगेच्या पातळीत वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:20 AM2023-07-26T11:20:08+5:302023-07-26T15:23:22+5:30

काेल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

Four automatic gates of Radhanagari dam opened, increasing water level of Panchganga in kolhapur | Kolhapur: राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, ८५४० क्यूसेक विसर्ग सुरु; पंचगंगेच्या पातळीत वाढ होणार

Kolhapur: राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, ८५४० क्यूसेक विसर्ग सुरु; पंचगंगेच्या पातळीत वाढ होणार

googlenewsNext

गौरव सांगावकर 

राधानगरी/कोल्हापूर :  धरणपाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने धरणपाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरल्याने धरणाचे एकूण चार स्वयंचलित दरवाजे आज, बुधवारी (दि.२६) सकाळी उघडले. या चार दरवाज्यातून  ५७१२ क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा एकूण ७११२ क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. पाणी पातळी ३४७.३६ फूट इतकी आहे. संभाव्य पुरपरिस्थिती लक्ष्यात घेवून जलसंपदा विभागाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  

धरणाचा क्रमांक सहा चा स्वयंचलित दरवाजा सकाळी ८:१५ मिनीटांनी उघडला. तर पाठोपाठ सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी  क्रमांक ५ चा  स्वयंचलित दरवाजा उघडला. यानंतर १०:०३ मिनिटांनी क्र. ३ व १० वाजून ०६ मिनिटांनी क्रमांक ४ असे एकूण क्रमांक ३,४,५,६ दरवाजे उघडले. त्यानंतर दुपारी १ :२३ मिनिटांनी पाचवा दरवाजा उघडला. असे एकूण क्रमांक ३,४,५,६,७ या पाच दरवाज्यातून  ७१४० क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा एकूण ८५४० क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात धरणाचे दरवाजे उघडले होते. या वर्षी मात्र मुसळधार पावसामुळे दरवाजे जुलै अखेरच उघडले.

जिल्ह्यात काल, मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणातून विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीची पातळीत वाढ होणार आहे. दरम्यानच पन्हाळा तालुक्यातील धारवाडी डोंगर खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची उघडझाप राहिल्याने नद्यांचे पाणी संथगतीने वाढत आहे तरीही कोल्हापूरकरांच्या मनात महापुराची धास्ती आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कता म्हणून नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू केले आहे. काेल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे.

पडझडीत २३.६८ लाखांचे नुकसान

जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत ५६ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामध्ये २३ लाख ६८ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

‘एसटी’चे ३४ मार्ग बंद

पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने जिल्ह्यातील वाहतूक काहीशी ठप्प झाली आहे. एस.टी.चे ३४ मार्ग बंद झाले आहेत, तर १३ इतर जिल्हा मार्ग व १९ ग्रामीण मार्ग बंद झाले आहेत.

अलमट्टी ५८ टक्के भरले

अलमट्टी धरण केवळ ५८ टक्के भरल्याने पुराचे पाणी गतीने पुढे सरकत आहे. या धरणातून सध्या प्रतिसेकंद ८८५७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणावर कोल्हापुरातील पुराची स्थिती अवलंबून असल्याने सगळ्यांच्या नजरा या धरणाकडे लागल्या आहेत.

बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंदच

भोगावती नदीवरील बालिंगा पूल हा सव्वाशे वर्षांपूर्वीचा असून, मध्यंतरी त्याची डागडुजी केली होती. मात्र, सुरक्षितेच्या कारणासाठी मंगळवारी वाहतुकीसाठी पूल पूर्णपणे बंदच करण्यात आल्याने नागरिकांची गैरसाेय झाली आहे.

जिल्ह्यातील २७ गावांतील शाळा बंद

जिल्ह्यातील नद्यांना आलेला पुराचा विचार करता करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील २७ गावातील शाळांना आज, बुधवारी सुटी देण्यात आली आहे.
 

Web Title: Four automatic gates of Radhanagari dam opened, increasing water level of Panchganga in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.