पहिली उचल ३२०० रुपये द्या

By admin | Published: October 26, 2016 12:43 AM2016-10-26T00:43:25+5:302016-10-26T00:44:59+5:30

जयसिंगपुरात विराट ऊस परिषद : न दिल्यास हातात बुडका घेण्याचा ‘स्वाभिमानी’चा इशारा

Give the first pick up 3200 rupees | पहिली उचल ३२०० रुपये द्या

पहिली उचल ३२०० रुपये द्या

Next


कोल्हापूर / जयसिंगपूर : यंदाच्या हंगामासाठी उसाला टनास पहिली उचल म्हणून एकरकमी ३२०० रुपये द्या, नाहीतर आम्ही हातात बुडका घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जयसिंगपूर येथे झालेल्या विराट ऊस परिषदेत ऊसदराचे रणशिंग फुंकले. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी यावर्षी सरकार आपले असले तरी शेतकऱ्यांनी लढ्यास सज्ज व्हावे, असे आवाहन केल्यावर त्यास उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी हात उंचावून पाठबळ दिले.
जयसिंगपूर येथील मालू ग्रुपच्या मैदानावर ही १५ वी परिषद झाली. त्यास कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुण्यासह मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने शेतकरी आले होते. यापूर्वीचा गर्दीचा उच्चांक या परिषदेने मोडला. अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक होते. परिषदेला वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजनकाका तावरे, चंद्रराव तावरे, सतीश काकडे, भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, डॉ. श्रीवर्धन पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
परिषदेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजितदादा पवार यांच्यावर सर्वच नेत्यांनी सडकून टीका केली. परिषदेला महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दुपारी दोनची परिषदेची वेळ होती; परंतु चारनंतरच मैदान भरून गेले. यावेळी सावकर मादनाईक, प्रज्ञा दीपक पाटील (कोरोची), विक्रम पाटील, जयकुमार कोले, छगन पवार, माणिक पाटील वाळवा, कर्नाटक संघटनेचे राजू संकपाळ, शिरोळच्या माजी उपसभापती अश्विनी कांबळे यांची भाषणे झाली.


दादा, तुम्ही किती देणार ते सांगा
गत हंगामातील उसाचे हुतात्मा साखर कारखान्याच्या वैभव नायकवडी यांनी २७२४ रुपये एफआरपी बसत असताना २७७५ रुपये दिले. माळेगाव कारखान्याने २४१२ रुपये बसत असताना २८०० रुपये दिले. आता अजित पवारसाहेब तुम्ही मोठ्या पक्षाचे नेते आहात, तुमच्याकडेही पाच-पंचवीस कारखाने आहेत, त्यामध्ये तुम्ही किती एफआरपी देता हे एकदा जाहीर कराच, असे आव्हान खासदार शेट्टी यांनी दिले.


पाच नोव्हेंबरची मुदत
पाच नोव्हेंबरपर्यंत सरकारने पुढाकार घेऊन कारखानदार व शेतकरी यांची चर्चा घडवून आणावी, अन्यथा आम्ही धुराडी पेटवू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केव्हाही सत्तेवर लाथ मारून रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांंगितले.


काँग्रेसवाल्यांना पुन्हा १५ वर्षे सत्ता नाही : सदाभाऊ खोत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बरोबरच आहेत. वेळप्रसंगी ते हातात उसाचा बुडका घेऊन कारखानदारांना वठणीवर आणतील. काळजी करू नका, आम्ही म्हणतो तसे सरकार चालले तर दोन्ही काँग्रेसवाल्यांना पुढची १५ वर्षे सत्ता नाही, असे भाकीत मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

चर्चेला गर्दीनेच उत्तर : मराठा समाजाच्या मोर्चात खा. शेट्टी यांनी भाग घेतला नाही म्हणून ऊस परिषदेला मराठा शेतकरी उपस्थित राहणार नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर होती. उच्चांकी गर्दीने त्यास उत्तर दिलेच, त्याशिवाय शेतकरी हा जातपात न पाहता घामाचे दाम मिळवून देणाऱ्याच्या मागे उभा राहतो, हे शेतकऱ्यांनी दाखवून दिल्याची चर्चा परिषदेत होती.


परिषदेतील ठराव
यंदाच्या हंगामात (२०१६-१७) उसाला प्रतिटन पहिली उचल विनाकपात एकरकमी ३२०० रुपये द्या.
गत हंगामातील एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर फौैजदारी दाखल करा.
सहकारी साखर कारखाने फुकापासरी विकत घेणाऱ्यांची व त्यांना पतपुरवठा करणाऱ्यांची सीबीआयमार्फत
चौकशी करून त्यांच्यावर आर्थिक गुन्हे दाखल करा.
शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडा.
ऊस वाहतूकदारांसाठी स्वतंत्र महामंडळ करा.
उसावरील खरेदी कर त्वरित माफ करा व राज्य बँकेकडून मूल्यांकनाच्या ९० टक्के उचल द्या.
साखरेच्या दरावरील नियंत्रण काढून गॅस अनुदानाच्या धर्तीवर थेट सबसिडी ग्राहकांना द्यावी.
सोयाबीनची खरेदी आधारभूत किमतीने सरकारने करावी.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी करा.
शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या आयकरमुक्त करा.
कोणत्याही अटी न घालता मराठा समाजाला आरक्षण द्या.

Web Title: Give the first pick up 3200 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.