राज्यपालांनी घटनेचे संकेत पाळावेत : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:47+5:302021-02-06T04:45:47+5:30
कोल्हापूर : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यापालांना वापरलेला शब्द बोलण्याच्या ओघात तोंडातून गेला असावा. मात्र, राज्यपाल ...
कोल्हापूर : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यापालांना वापरलेला शब्द बोलण्याच्या ओघात तोंडातून गेला असावा. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यघटनेचे महत्त्व ठेवावे. ते राज्य घटनेचे संकेत पाळत नाहीत. त्यांनी घटनेनुसार काम करावे, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप व शिवसेनेच्या आंदोलनाबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या दराने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तर पेट्रोलचे शतक ठोकण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. लोकांना राग अनावर झाला असून, भविष्यात त्याचा उद्रेक होईल.
ग्रामपंचायत सरपंच पदासाठी काढलेले आरक्षण हे कायद्यानुसार एकदमच काढावे लागते, त्यानुसार प्रक्रिया पार पडली असून, शिर्डी संस्थान हे स्वायत्त आहे, तरीही प्रसारमाध्यमांची अडवणूक करू नये यासाठी सूचना करू, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
चौकट-
विधानसभा अध्यक्षावर मार्ग निघेल
विधानसभा अध्यक्ष पदावर कोणत्याही प्रकारचे त्रांगडे नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते बसून यावर मार्ग काढतील. आघाडी सरकारमध्ये अनेकजण संकटमोचक असून, ते निश्चित मार्ग काढतील, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.