बंड केल्यास भाजपतून सुटी
By Admin | Published: August 16, 2015 11:57 PM2015-08-16T23:57:38+5:302015-08-16T23:57:38+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा
कोल्हापूर : तिकीट मिळेल तो निवडणूक लढवेल, मात्र ज्याला तिकीट मिळणार नाही, त्याने देशातील सर्वांत मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगून भाजपसाठी कार्यरत राहावे. प्रामाणिकपणे आणि शिस्तीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केले जाईल. मात्र, पक्षाविरोधात बंड करणाऱ्याची पक्षातूनच सुटी दिली जाईल, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या पूर्वतयारी मेळाव्यात ते बोलत होते. येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवनातील मेळाव्यास भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा संघटनमंत्री व ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, रामभाऊ चव्हाण, प्रताप कोंडेकर, विश्वविजय खानविलकर प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, भाजप-ताराराणी आघाडीकडून महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वांना तिकीट देणे शक्य नाही. ज्याला तिकीट मिळणार नाही, त्याने प्रामाणिकपणे, शिस्तीत पक्षासाठी काम करावे. अशा कार्यकर्त्यांना पक्षाकडून काही तरी दिलेच जाईल; केंद्राच्या ‘अमृत’ योजनेत कोल्हापूरचा सहभाग झाला आहे. ‘हृदय’ आणि स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील झोपडपट्टीधारकांना पक्की घरे, महिला व वृद्धांची सुरक्षितता, अंडरग्राऊंड गटर्स, स्वच्छ पाणी, पंचगंगा नदी घाट, रंकाळा शुद्धिकरण, विमान सेवा, आदींच्या पूर्ततेद्वारे शहराचा विकास हे आपले ध्येय आहे. ते साधण्यासाठी महानगरपालिकेवर भाजप-ताराराणीचा झेंडा फडकविण्यासाठी झटावे. महानगर जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होणे आवश्यक आहे. भाजप-ताराराणी आघाडीचे ६० हून अधिक उमेदवार निवडून येतील. आघाडी अभेद्य आहे. मेळाव्यास माणिक पाटील-चुयेकर, माजी महापौर नंदकुमार वळंजू, अॅड. संपतराव पवार, नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, नगरसेविका प्रभाताई टिपुगडे, नीलेश पटेल, विजय जाधव, अशोक देसाई, आदी उपस्थित होते. राहुल चिकोडे यांनी सूत्रसंचालन केले. ऊठसूठ पत्रक काढू नका... राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर भाजप-सेनेची युती कायम राहावी म्हणून मी केलेले प्रयत्न सर्वांना माहीत आहेत; पण काहींना त्यांची जाणीव नसल्याने ते काहीही बोलत आहेत, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लगाविला. शिवाय त्यांच्याकडून होणाऱ्या टीका-आरोपांना उत्तरे देण्यास मी सक्षम आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने ऊठसूठ पत्रक काढू नये, असा सल्लादेखील मंत्री पाटील यांनी दिला. ते म्हणाले, प्रामाणिकपणे कार्यरत रहिल्यास पक्षाकडून दखल घेतली जाते. त्याचे उत्तम उदाहरण मी आहे. स्वत:पेक्षा पक्ष आणि पक्षाहून देश मोठा समजून कार्यरत राहा. इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यातील काही इच्छुक आपल्याकडे पालकमंत्री आणि कोअर कमिटी यांचे लक्ष वेधले जावे, याकरिता हलगी, झांज वाजवत नागाळा पार्कातील जयलक्ष्मी हॉलमध्ये प्रवेश करत होते. ‘रिपाइं’ (ए)ने केली ११ प्रभागांची मागणी कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)ने भाजप-ताराराणी आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाला ११ प्रभाग मिळावेत, अशी मागणी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे व जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व महायुतीच्या नेत्यांकडे केली आहे. ओबीसींसाठी ४, अनुसूचित जातीसाठी ५ व सर्वसाधारण १, अशा जागांवर त्यांनी दावा केला आहे. यामध्ये कदमवाडी, टेंबलाईवाडी, संभाजीनगर, कळंबा फिल्टर हाऊस, फुलेवाडी रिंग रोड, क्रांतिसिंह नाना पाटील नगर (कणेरकर नगर), क्रांतिसिंह नाना पाटील नगर (जीवबा नाना जाधव पार्क), राजेंद्रनगर, सिद्धार्थनगर, सदर बाजार, सुधाकर जोशी नगर या प्रभागांची मागणी करण्यात आली आहे. ‘रिपाइं’ला सन्मानाची वागणूक देऊन जागा सोडाव्यात, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.