‘आजरा’साठी नेतेमंडळींच्या अस्तित्वाचा कस लागणार
By admin | Published: May 4, 2016 11:42 PM2016-05-04T23:42:42+5:302016-05-05T00:51:23+5:30
आजरा-श्रृंगारवाडी गट : मातब्बर परस्परविरोधात दंड थोपटणार
ज्योतीप्रसाद सावंत --आजरा साखर कारखाना निवडणुकीत राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आजरा-श्रृंगारवाडी गटामध्ये उत्पादक गटातून मातब्बर नेतेमंडळी परस्परविरोधात दंड थोपटणार असल्याने प्रमुख नेतेमंडळींच्या राजकीय अस्तित्वाची लढाई याच गटातून होणार आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
मुळातच या गटात आजरा शहराचा समावेश असल्याने आणि सर्वच प्रमुख संस्थांचा कारभार आजऱ्यातून चालत असल्याने या गटामध्ये ज्या नेतेमंडळींना आपले वर्चस्व सिद्ध करता येते, ती मंडळी तालुक्याच्या राजकारणात वर्चस्व निर्माण करू शकतात हे इतिहासाने सिद्ध करून दाखविले आहे.
स्व. वसंतराव देसाई शेतकरी विकास आघाडीने या गटातून आघाडीप्रमुख अशोकअण्णा चराटी, माजी साखर कारखाना उपाध्यक्ष दिगंबर देसाई आणि तालुका संघाचे माजी उपाध्यक्ष राजू होलम यांना संधी दिली आहे. विरोधी राष्ट्रवादी व समविचारी आघाडीकडून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, विद्यमान अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा व माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची उमेदवारी निश्चित आहे.
या गटातून एकूण २९ उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी प्रमुख दोन आघाड्यांमधील उमेदवार निश्चित असल्याने उमेदवारीतून नाराज मंडळींच्या भूमिकेवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. या गटात सर्वांत जास्त मतदान आजरा (१४३५), तर सर्वांत कमी मतदान भावेवाडी (५८) येथे आहे.
सर्वच पक्ष व गटा-तटाचे राजकारण या गटामध्ये असल्याने प्रमुख उमेदवारांना मताधिक्याची निश्चित गणिते या गटात मांडता येत नाहीत हे वास्तव आहे. स्व. देसाई आघाडीतून ६५८ मतदार असणाऱ्या वाटंगी गावातून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही, तर शिरसंगी या ६०८ मतदार असणाऱ्या गावातून राष्ट्रवादीची उमेदवारी अद्याप निश्चित नाही.
जयवंतराव, मुकुंदराव, अशोकअण्णा, दिगंबर देसाई, अल्बर्ट डिसोझा व राजू होलम हे सर्वच मातब्बर या गटातून असल्याने अत्यंत चुरशीची लढत या मतदारसंघात होणार हे स्पष्ट आहे.