पशुसंवर्धनकडून प्रत्येक जनावराला इनाफ बिल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:54+5:302021-02-06T04:42:54+5:30
रमेश सुतार लोकमत न्यूज नेटवर्क बुबनाळ : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी, देशातील संपूर्ण दुधाळ व ...
रमेश सुतार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुबनाळ : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी, देशातील संपूर्ण दुधाळ व जातिवंत पशूंची माहिती एका क्षणात उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने इनाफ बिल्ले बसविण्याची (टॅग) महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून, या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे टॅग बिल्ला मारण्याचे काम निरंतर सुरु राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ऊस, केळी यासारखी नगदी पिके घेतली जातात. या पिकांना उत्तम शेणखताची गरज असते. रासायनिक खतांच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे पर्याय म्हणून पदरी दोन-चार दुभती जनावरे बाळगण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. परंतु, या जनावरांच्या वर्षभरात कोणत्या रोगाच्या साथी येतात. त्यावेळी बाधित जनावरांना कोणती लस द्यावी, जातिवंत वळूची अथवा जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींची माहिती शेतकऱ्यांना नसते. तसेच विविध शासकीय योजनांतून जनावरांसाठी उपलब्ध होणारे अनुदान यासारख्या बाबी दूध उत्पादकांना माहीत नसतात. या सर्वांवर उपाय म्हणून आॅनलाईन नोंदणी करुन गाय, म्हैस यांचे आधारकार्ड बनवले जाणार आहे. बाजारात शेतकऱ्यांना जातिवंत जनावरे निवडीसाठी याची मदत होणार आहे. जनावरे नैसर्गिक आपत्तीने, वीज पडून, महापुरात वाहून गेल्यास, विजेचा धक्का लागून किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात दगावल्यास त्यांच्या कानात बिल्ला असल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नाही.
--------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधन
* गाय २,७५,११४
* म्हैस - ६,१२,९९८
* एकूण जनावरे ८,८८,१११
कोट - संपूर्ण देशात जनावरे एकाच क्रमांकाने ओळखली जातात. शासकीय योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या जनावरांना बिल्ला मारलेला असणे आवश्यक आहे. जनावराला बिल्ला असल्याशिवाय बाजारात खरेदी, विक्री करता येणार नाही. चोरी केलेली जनावरे या बिल्ल्यामुळे शेतकऱ्यांना मिळू शकतात.
- डॉ. वाय. ए. पठाण, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन
फोटो - ०४०२२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - पशुसंवर्धन विभागाकडून प्रत्येक गावात जनावरांना इनाफ बिल्ला मारण्याचे काम सुरु आहे.