प्रतिकूल परिस्थितीमध्ये १९६५ चे युद्ध भारताने जिंकले : दांडेकर

By Admin | Published: June 24, 2015 12:37 AM2015-06-24T00:37:38+5:302015-06-24T00:41:06+5:30

--राजर्षी शाहू व्याख्यानमाला

India won the 1965 war in adverse conditions: Dandekar | प्रतिकूल परिस्थितीमध्ये १९६५ चे युद्ध भारताने जिंकले : दांडेकर

प्रतिकूल परिस्थितीमध्ये १९६५ चे युद्ध भारताने जिंकले : दांडेकर

googlenewsNext

कोल्हापूर : पाकिस्तानच्या तुलनेमध्ये जुनी युद्धसामग्री असतानाही भारतीय सैन्याने १९६५ चे युद्ध जिंकले. चीनविरुद्धच्या १९६२ च्या युद्धातील पराभव, पंतप्रधान नेहरूंचे निधन अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे युद्ध झाले, पण मोठ्या हुशारीने भारतीय सैन्याने लाहोरपर्यंत धडक मारली, असे प्रतिपादन युद्धशास्त्र अभ्यासक विश्वास दांडेकर यांनी केले. कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या शाहू व्याख्यानमालेत मंगळवारी दांडेकर बोलत होते. भारत-पाक युद्धाची ५० वर्षे हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील होत्या. दांडेकर म्हणाले, चीनसोबत १९६२ मध्ये भारताचा विदारक पराभव झाला. या पराभवामुळे पंतप्रधान नेहरू खचून गेले. या युद्धानंतर त्यांचे निधनही झाले. नेहरूंनंतर लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले. शास्त्री हे कमकुवत पंतप्रधान असा देशात आणि परदेशातही गैरसमज निर्माण झाला होता. अन्नधान्याच्या समस्येने देशाला ग्रासले होते. अशातच चीन आणि पाकची मैत्री वृद्धिंगत होत होती. अमेरिकेकडून पाकला ‘पॅटर्न’सारखे अत्याधुनिक रणगाडे व शस्त्रसामग्री मिळाली होती. त्यामुळे पाकने भारताविरुद्ध १९६५ चे युद्ध पुकारले.
दांडेकर म्हणाले, या युद्धात लष्कराला युद्ध तंत्राबाबतचे निर्णय घेण्याची मुभा देत लाल बहादूर शास्त्रींनी हे युद्ध जिंकले. तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या बुद्धीची चुणूकही या युद्धादरम्यान देशाने अनुभवली. कच्छ, जम्मू-काश्मीर आणि पंजाब या ठिकाणी हे युद्ध लढले गेले पण कमीत-कमी शस्त्रसाठा खर्च करत भारतीय सैन्यांनी लाहोरपर्यंत धडक मारली. या युद्धात सैन्याला पंजाबमधील शेतकऱ्यांपासून ते जम्मू-काश्मीरमधील नागरिकांची कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत झाली. काश्मीरमधील जनतेने पाकमधून नागरिकांच्या वेषात आलेल्या सैनिकांना मदत केली नाही. पंजाबमधील शेतकऱ्यांनी भारतीय विमानतळ उद्ध्वस्त करण्यासाठी पॅराशूटमधून उतरणाऱ्या पाक सैनिकांना पकडले. अमृतसर ते लाहोर या दरम्यानच्या मार्गावरील पाकिस्तानी सैन्यांची ठिकाणे शोधून त्यांना चकवा देण्यासाठी सीमेवरील तस्करांनीही मदत केली. आज हुकूमशाहीचे खूप वेड आहे पण सैन्य आणि जनता यांचा काय संबंध असतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण सैन्य हे या देशातील जनतेमधूनच आलेले असते. भारतामध्ये अनेक जाती समुदाय आणि धर्म असले तरी, एकात्मता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. ही एकात्मता सैन्यातही असते. त्यामुळे भारतीय सैन्याकडून नागरी शासन बळकावण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. याउलट पाकिस्तान आणि बांगलादेशामध्ये सैन्याकडून सत्ता ताब्यात घेण्याचे प्रकार घडलेले आहेत. भारत-पाकिस्तान युद्धानंतरच्या पन्नास वर्षांत भारताने ही गोष्ट कमावलेली आहे. हुकूमशाही ही कोणत्याही देशाला धोकादायकच असते, असे मतही दांडेकर यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भारती पाटील म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकले, याचा अभिमान बाळगला पाहिजे. या युद्धात काश्मीरमधील जनताही भारताशी एकरूप राहिली.
प्रमुख वक्त्यांचे स्वागत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, डॉ. अशोक चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते. प्रा. सूर्यकांत गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: India won the 1965 war in adverse conditions: Dandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.