पूरग्रस्तांसाठी जनता दल आंदोलन छेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:01+5:302021-08-17T04:29:01+5:30
गडहिंग्लज : जनता दलाच्या संघर्षामुळेच गडहिंग्लज तालुक्यातील पूरग्रस्त वसाहती उभ्या राहिल्या; परंतु त्या वसाहतींमधील मूलभूत नागरी प्रश्न अजूनही सुटलेले ...
गडहिंग्लज :
जनता दलाच्या संघर्षामुळेच गडहिंग्लज तालुक्यातील पूरग्रस्त वसाहती उभ्या राहिल्या; परंतु त्या वसाहतींमधील मूलभूत नागरी प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. नव्याने पूरबाधित झालेल्यांचेही पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी जनता दलातर्फे आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी 'लोकमत'ला दिली.
शिंदे म्हणाले, १९८३ च्या महापुरामुळे विस्थापित झालेल्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जनता दलाने व्यापक चळवळ उभी केली. त्यासाठी आपल्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तुरुंगवासही भोगला. त्यामुळे पूरग्रस्तांच्या वसाहती उभ्या राहिल्या.
तथापि, अरळगुंडी, कडलगे, नांगनूर, खणदाळ, नूल, हिटणी, निलजी, हेब्बाळ, दुंडगे, जरळी, भडगाव, गिजवणे, इंचनाळ, ऐनापूर, बेळगुंदी व हिरलगे दरम्यानच्या पूरग्रस्त वसाहतीमधील नागरी सुविधांचा प्रश्न अजूनही जैसे थे आहे, याकडेही शासनाचे लक्ष वेधणार आहे.
पूरग्रस्त वसाहतींमधील नागरी समस्या आणि पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी अरळगुंडी ते हिरलगेपर्यंत संपर्क मोहीम राबविणार आहे. त्यानंतर पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी प्रांत कचेरीवर मोर्चादेखील काढणार आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
-------------------
श्रीपतराव शिंदे : १६०८२०२१-गड-०८