सोलापूरला पाणी देण्यास कर्नाटक तयार
By Admin | Published: May 3, 2016 11:23 PM2016-05-03T23:23:58+5:302016-05-04T00:51:35+5:30
पाटबंधारेची माहिती : कर्नाटकला आणखी एक टीएमसी देण्यास सुरुवात
सांगली : चांदोली (वारणा) आणि कोयना धरणातून कर्नाटकला मागील आठवड्यात पाच दिवसात एक टीएमसी पाणी दिले आहे. आता पुन्हा महाराष्ट्राने मंगळवारपासून कर्नाटकला राजापूर बंधारा येथून एक टीएमसी पाणी मोजून देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोबदल्यात कर्नाटक सोलापूर जिल्ह्यासाठी कृष्णा नदीवरील नारायणपूर धरणातून (जि. बागलकोट) दोन टीएमसी पाणी देण्यास तयार झाले आहे. गरज लक्षात घेऊन पाणी घेणार असल्याचेही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्नाटकातील नदीकाठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापूर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावांतील कृष्णा नदीवरील नळपाणी योजना पाणी टंचाईमुळे बंद होत्या. त्यामुळे कर्नाटक सरकारने पाणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कर्नाटकला पाणी देण्यासाठी कोयना आणि वारणा (चांदोली) धरणातून मागील आठवड्यात दि. २५ ते ३० एप्रिल कालावधित एक टीएमसी पाणी सोडले आहे. त्यानंतर राजापूर बंधारा येथून पाणी सोडणे बंद केले आहे. पुन्हा कर्नाटक सरकारने आणखी एक टीएमसी पाणी देण्याची मागणी केली होती.
सोलापूर जिल्ह्याला पाणी देण्याच्या अटीवर मंगळवारपासून कोयना व वारणा धरणातून कर्नाटकसाठी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. राजापूर बंधारा येथून मोजून पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या मोबदल्यात कर्नाटक सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी दोन टीएमसी पाणी देण्याचे मान्य केले आहे.
टंचाई जाणवल्यानंतर लगेच कर्नाटक सरकारकडे पाण्याची मागणी करणार आहे. त्यानुसार त्यांनी पाणी सोडण्याची तयारी दर्शविली आहे, असेही सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
असे मिळणार पाणी...
कर्नाटकमधील अलमट्टी धरणापासून ५० ते ६० किलोमीटर अंतरावर बागलकोट जिल्ह्यात कृष्णा नदीवर नारायणपूर धरण आहे. येथून दोन टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याला मिळणार आहे. परंतु, सध्या भीमा नदीच्या पाण्यावर सोलापूरची गरज भागली आहे.