कुडित्रेत पुन्हा केएमटी बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:29+5:302021-02-06T04:44:29+5:30
करवीर तालुक्यातील कुडित्रे गाव कुंभी कासारी कारखान्यामुळे विकसित झाले आहे. येथे शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक विकास झाल्याने प्रवाशांची संख्या ...
करवीर तालुक्यातील कुडित्रे गाव कुंभी कासारी कारखान्यामुळे विकसित झाले आहे. येथे शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक विकास झाल्याने प्रवाशांची संख्या प्रचंड असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचा स्त्रोत असल्याने १९७१ पासून महानगरपालिकेची केएमटी सेवा सुरू केली. ती २०१५ पर्यंत अविरत सुरू होती. या बससेवेचा करवीरच्या पश्चिम भागातील २० ते २५ गावांना फायदा होत होता. पण अचानक उत्पन्नाचे कारण पुढे करून महानगरपालिकेने गेल्या पाच वर्षांपासून ही बस सेवा बंद केली. याचा मोठा फटका करवीरच्या पश्चिमेला असणाऱ्या गावांना बसला.
याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार ग्रामस्थांनी निवेदने देऊनही येथून खासगी प्रवासी वहातुकीमुळे उत्पन्न कमी मिळत असल्याचे कारण देत बेदखल केले. यानंतर ग्रामस्थांनी एसटी सेवेसाठी लोकप्रतिनिधींची मनधरणी करून काही दिवस फेऱ्या सुरू केल्या, त्याही बंद करण्यात आल्या. दोन वर्षापूर्वी परिवहन सभापती सचिन चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून केएमटी सेवा सुरू केली; पण नंतर तीही बंद झाली, ती आजपर्यंत बंद होती. पण ग्रामस्थांच्या प्रयत्नातून आणि पालिका प्रशासनाने केएमटी उत्पन्न वाढीचा चांगला मार्ग असल्याचा अभ्यास करून आज पाच वर्षांनंतर केएमटी बस सेवा पुन्हा सुरू केल्याने कामगार, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदारांची मोठी सोय होणार आहे. यामुळे ग्रामस्थ व प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
(फोटो) कुडित्रे (ता. करवीर) येथे केएमटी बससेवेचा प्रारंभ कुंभी कारखान्याचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य, कुंभी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, विलास पाटील, आनंदराव पाटील, संजय शेलार, रघुनाथ शेलार, अजित पाटील व ग्रामस्थ.