कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरण: जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 06:44 PM2022-11-12T18:44:55+5:302022-11-12T18:45:18+5:30

बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून गावांतील ज्या लोकांनी त्यांना चिडवले, चेष्टा केली ते चिडवून घरी गेले आणि या तरुणांच्या मनात मात्र बदल्याचा वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले.

Kolhapur Honor Killing Case, The Reality of a Generation Ended by Caste Ego | कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरण: जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव

कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरण: जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव

Next

कोल्हापूर : जातीच्या अहंकारातून एक पिढी संपल्याचे वास्तव ऑनर किलिंगच्या घटनेतून पुढे आले. त्यांच्या बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून गावांतील ज्या लोकांनी त्यांना चिडवले, चेष्टा केली ते चिडवून घरी गेले आणि या तरुणांच्या मनात मात्र बदल्याचा वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले. ज्यांनी या दोन भावांना चिडवले, टोचले ते सारे आज आपापल्या कुटुंबात आनंदात आहेत आणि दोन उमलणारी आयुष्ये मात्र जन्मभरासाठी कारागृहात गेली. त्यामुळे त्यांना टोचा मारमारे समाजातील कावळेही या घटनेस तितकेच कारणीभूत आहेत.

आरोपी गणेश व जयदीप हे कोल्हापुरातील एका महाविद्यालयात शिकत होते. गावातील लोक बहिणीच्या आंतरजातीय प्रेमविवाहावरून या दोघा भावांना वारंवार विचारून चेष्टा करत होते. याचा राग मनात धरून या दोघांनी बहिणीसह तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. यात बहिणीचा मृत्यू तर दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास अर्थात जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांचे वयही २० वर्षांच्या आतील आहेत, त्यामुळे एका कुटुंबातील एक पिढीच संपुष्टात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात २०१५ पूर्वी आंतरजातीय प्रेमविवाहातून मुलीच्या घरच्यांनी लग्नास विरोध केल्याच्या घटना अनेक आहेत. मात्र, अशा प्रकारे आपल्याच बहिणीची व तिच्या पतीची हत्या करणे अशी घटना प्रथमच कसबा बावडा येथे घडली. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष या खटल्याकडे लागले होते.

सैराटमध्ये प्रतिबिंब..

कसबा बावडा येथील ही ऑनर किलिंगची घटना घडल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा झाली. समाजमन सुन्न झाले होते. बहिणींने प्रेमविवाह केल्यावर भाऊ किती टोकाला गेले आणि तेही समाजाने कावळ्यासारखे टोचल्यानेच हे घडले. त्याचदरम्यान नागराज मंजुळे यांचा सैराट हा याच विषयांवरील चित्रपट आला. त्याचा शेवटही कसबा बावड्यातील घटनेसारखाच होता. त्यामुळे ऑनर किलिंगच्या या घटनेचे प्रतिबिंब त्या चित्रपटात उमटले होते. चित्रपटाचा शेवट पाहतानाही लोक बधिर होऊनच चित्रपटगृह सोडत होते. समाजाचे हे वास्तव आज फारसे बदलले आहे, असे चित्र नाही. बाई मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो ती पायातलं वहान बनूनच राहिली पाहिजे, ही मानसिकता अजूनही टिकून आहे व ती टिकलीमधून अधूनमधून व्यक्तही होत आहे.

या घटनेत फिर्यादीसह १६ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता; परंतु फिर्यादी आपल्या जबाबावर ठाम राहिल्याने न्यायालयाने शिक्षा ठोठावली. शाहूपुरीचे तत्कालीन निरीक्षक अरविंद चौधरी यांनी बारकाईने केलेला तपासही तितकाच महत्त्वाचा ठरला.

Web Title: Kolhapur Honor Killing Case, The Reality of a Generation Ended by Caste Ego

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.