बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:32+5:302021-02-08T04:20:32+5:30
गडहिंग्लज : कर्नाटक व आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी ग्रामविकास ...
गडहिंग्लज : कर्नाटक व आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
माजी सभापती अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील अल्पभूधारक शेतकरी बैलजोडीच्या साहाय्यानेच शेतीची मशागत करतात. त्यांतील काही हौशी शेतकरी बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेतात.
तथापि, गेल्या ७-८ वर्षांपासून बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्यामुळे केवळ शेतीसाठी बैलजोडी बाळगणे आणि त्यांचे संगोपन करणे असह्य झाले आहे.
शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे आपल्या बैलांची काळजी घेतो. ही बाब विचारात घेऊन पुन्हा बैलजोडी शर्यतीला परवानगी द्यावी; त्यामुळे ग्रामीण भागातील यात्रा व उरूस यांमध्ये पूर्वीप्रमाणे नवा उत्साह येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात राजू जाधव, अरुण फराकटे, चैतन्य खोत, प्रकाश रणनवरे, जावेद पटेल, सूरज पाटील, आदींचा समावेश होता.