मेघोली तलाव फुटून कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:25 AM2021-09-03T04:25:13+5:302021-09-03T04:25:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी /शिवाजी सावंत मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे तलाव बुधवारी (दि. १ सप्टेंबर) रात्री साडेदहा ...

Loss of crores of rupees due to rupture of Megholi lake | मेघोली तलाव फुटून कोट्यवधी रुपयांचे नुकसान

मेघोली तलाव फुटून कोट्यवधी रुपयांचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी /शिवाजी सावंत

मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे तलाव बुधवारी (दि. १ सप्टेंबर) रात्री साडेदहा वाजता फुटला. तलावाच्या पायथ्याशी असलेल्या गळतीमुळे हा मातीचा तलाव फुटला. यामुळे ओढ्याच्या दोन्ही बाजूची सर्व पिके आणि माती वाहून गेली आहे. मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ, तळकरवाडी या गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हा तलाव रात्री फुटल्यामुळे अल्प प्रमाणात जीवितहानी झाली. जर तलाव दिवसा फुटला असता तर शेतात काम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असता. अवघ्या अडीच तासांत हा तलाव रिकामा झाला.

१९९६ साली हा मातीचा लघुपाटबंधारे तलाव बांधण्यास सुरुवात झाली, तर २००० च्या दरम्यान या धरणात ९८ दशलक्ष घनफूट क्षमतेने पाणी साठवण्यात येऊ लागले. या तलावाच्या बांधकामासाठी ८ कोटी ७० लाख रुपये खर्च आलेला आहे. या तलावामुळे मेघोली, सोनुर्ली, नवले, वेंगरुळ, तळकरवाडी या गावांतील ५०० हेक्टर जमिनी ओलिताखाली आल्या. या गावांसाठी हे तलाव म्हणजे जीवनदायी ठरले होते. पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला होता.

तलावाच्या पायथ्यालाच असलेल्या आऊटलेटजवळच्या भिंतीतून सुरुवातीपासून गळती लागलेली होती. याबाबत अनेकवेळा शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तत्कालीन सभापती कीर्ती देसाई यांनी पंचायत समितीच्या बैठकीत अनेकवेळा हा प्रश्न उचलून धरला होता, तर गतवर्षी आमदार प्रकाश आबिटकर, माजी सभापती बाबा नांदेकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन गळतीची पाहणी करून दुरुस्तीचा प्रस्ताव नाशिक येथे पाठविण्यात आला होता. तरीदेखील दुरुस्तीसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. गळतीच्या ठिकाणी सिमेंटच्या गोणीत वाळू भरून गळती थांबविण्यासाठी केविलवाणी धडपड प्रशासन करीत होते.

याचा परिणाम व्हायचा तो झाला. बुधवारी रात्री झोपेत असलेल्या या भागातील लोकांना हा हा म्हणता तलाव फुटल्याची बातमी समजली. घटना समजताच लोकांनी धरणस्थळ आणि ओढ्याकडे धाव घेतली. सगळीकडे अंदाधुंदी सुरू झाली. काळाकुट्ट अंधारात बॅटरीच्या उजेडात पाण्याचा प्रपात आणि आक्राळविक्राळ रूप पाहून उपस्थितांच्या काळजात धस्स झाले. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. जवळच्या गावांना सतर्क राहण्यासाठी फोन केले जाऊ लागले, तर उन्हाळ्यात पिण्यासाठी आणि शेतीला पाणी मिळणार नाही या धास्तीने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. आजही ही गावे या धक्क्यातून सावरलेली नाहीत. येत्या उन्हाळ्यात मेघोली, वेंगरुळ, नवले, सोनुर्ली, तळकरवाडी या गावांतील पिके आणि ग्रामस्थ पाण्यावाचून धोक्यात सापडणार आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार अश्विनी अडसुळ यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी करून सूचना केल्या, तर राहुल देसाई, अर्जुन आबिटकर, बाबा नांदेकर आणि प्रशासनातील सर्व अधिकारी, पदाधिकारी रात्री रात्रभर घटनास्थळी उपस्थित होते.

सुरक्षारक्षकही नाही

या धरणावर असलेल्या रक्षकाची बदली अन्य ठिकाणी केल्याने रात्री धरण फुटल्याचे स्थानिक लोकांच्याकडून प्रशासनाला समजले. बुधवारी रात्री कोंडुशी येथील काही तरुण जेवण करण्यासाठी तलावावर गेले होते. त्यावेळी जोरात आवाज ऐकू आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, धरण फुटले. त्यांनी त्या गावातील तुकाराम देसाई यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी लगेच गावातील लोकांना फोनवरून माहिती दिली व अनेकजण सतर्क झाले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

Web Title: Loss of crores of rupees due to rupture of Megholi lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.