‘त्या’ कलाकारांचे दीड लाखाचे दागिने लुटल्याचे निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:40+5:302021-02-07T04:23:40+5:30
कोल्हापूर : राचन्नावाडी (ता. चाकूर, जि. लातूर) येथील कलाकारांना कोल्हापुरात आणून जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्याच्या प्रकरणाचा पोलीस गतीने ...
कोल्हापूर : राचन्नावाडी (ता. चाकूर, जि. लातूर) येथील कलाकारांना कोल्हापुरात आणून जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्याच्या प्रकरणाचा पोलीस गतीने तपास करत आहेत. त्यांना धोतरा वनस्पतीच्या बियांची पावडर करून जेवणातून दिल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. या सर्व नऊ कलाकारांची प्रकृती अद्याप स्थिर असून, प्राथमिक तपासात त्यांचे सुमारे दीड लाखाचे दागिने व रोकड लुटल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.
श्री अंबाबाई देवीच्या जागरासाठी (आराधी) राचन्नावाडी येथून कोल्हापुरात आणलेल्या नऊ कलाकारांना मंगळवारी रात्री बिंदू चौकानजीक गंजी गल्लीतील एका यात्री निवासामध्ये ठेवले होते. त्यावेळी एका लुटारूने त्यांना जेवणातून गंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील दागिने लुटले होते. त्या सर्वांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्या सर्वांना शनिवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणून त्यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदवले. त्यानुसार त्यांचे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. तसेच या सर्वांना जेवणातून धोतरा वनस्पतीच्या बियांची पावडर करून घातल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या लुटारूच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली आहेत.