‘भूविकास’च्या कर्जमुक्तीची संधी
By admin | Published: October 31, 2015 12:28 AM2015-10-31T00:28:30+5:302015-10-31T00:29:35+5:30
‘ओटीएस’ योजना : थकीत कर्जातून ७५ टक्क्यांची सवलत, शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी
कोल्हापूर : भूविकास बॅँकेच्या थकबाकीदारांना कर्जमुक्ती होण्यासाठी एकरकमी परतफेड (ओटीएस) योजना सुरू केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर थकीत कर्जापैकी ७५ टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कर्जमुक्त होण्याचे आवाहन सहकार विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.भूविकास बॅँकेच्या कोल्हापूर शाखेकडे ९३१ थकबाकीदार शेतकरी आहेत. त्यांच्याकडे प्रचलित व्याजदराने ३० कोटी रुपये थकीत आहेत. गेली दोन-तीन वर्षे थकीत वसुलीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निकराचे प्रयत्न केले. यापूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्यासाठी अनेकवेळा एकरकमी परतफेड योजना राबविली. तिला प्रतिसाद मिळाला. उर्वरित शेतकऱ्यांसाठी शासनाने पुन्हा ही योजना सुरू केली आहे; पण सरकारचे भूविकास बॅँकांबाबतचे धोरण पाहता ही संधी शेवटची असणार आहे. एकूण थकबाकीच्या रकमेपैकी तब्बल ७५ टक्के सवलत मिळणार असल्याने शेतकऱ्यांसाठी हा बोनस ठरणार आहे. एक लाख थकबाकी असेल, तर त्यापैकी केवळ १७ ते १८ हजार रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची नामी संधी आली आहे.
या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी भूविकास बॅँकेने यंत्रणा कार्यरत केली आहे. बॅँकेच्या २५ कर्मचाऱ्यांचे पथक थकबाकीदार शेतकऱ्यांशी संपर्क साधत त्यांना योजनेची माहिती देत आहे. ‘कर्जमुक्तीची संधी - आता नाही तर कधीच नाही,’ असे आवाहन डिजिटल फलकांच्या माध्यमातून बॅँकेने केले आहे. या योजनेतून कर्ज भरून कर्जमुक्त न होणाऱ्या शेतकरी व संबंधित संस्थांवर थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी सहकार विभागाने सुरू केली आहे. आतापर्यंत भूविकास बॅँकेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात होती; त्यामुळे थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास टाळाटाळ व राजकीय हस्तक्षेप व्हायचा; पण आता सहकार विभागाने यात लक्ष घातल्याने कारवाई अटळ आहे.
कर्जमुक्त न झाल्यास थेट गुन्हे
भूविकास बॅँकेच्या थकबाकीदारांना गेली सहा-सात वर्षे बॅँकेकडून अभय मिळाले; पण आता सहकार खात्याने यात लक्ष घातल्याने मार्च २०१६ अखेर थकबाकी भरून कर्जमुक्त न झाल्यास १ एप्रिलपासून थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी सहकार खात्याने केली आहे.
या योजनेत सहभागी होऊन सात-बारा कोरा करण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. प्रचलित पद्धतीने भराव्या लागणाऱ्या थकबाकीमध्ये ७५ टक्के सवलत मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
- अरुण काकडे (जिल्हा उपनिबंधक)
बड्या थकबाकीदार संस्था
आकुर्डे-माणगाव पाणीपुरवठा, शाहूवाडी
सोनाळी पाणीपुरवठा संस्था, कागल
म्हाळुंगे पाणीपुरवठा संस्था, करवीर
तळशी पाणीपुरवठा संस्था, राधानगरी