हंगाम संपल्यावर 'राजाराम' बंदचे आदेश, कारखान्याचे व्यवस्थापन म्हणते..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 12:42 PM2022-03-05T12:42:33+5:302022-03-05T12:43:03+5:30

गंमत म्हणजे शुक्रवारी सायंकाळीच कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता झाली.

Order to close Chhatrapati Rajaram Sahakari Sugar Factory at the end of the season | हंगाम संपल्यावर 'राजाराम' बंदचे आदेश, कारखान्याचे व्यवस्थापन म्हणते..

हंगाम संपल्यावर 'राजाराम' बंदचे आदेश, कारखान्याचे व्यवस्थापन म्हणते..

googlenewsNext

कोल्हापूर : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व देखभाल यंत्रणा समाधानकारक नसल्याने कसबा बावडा (ता.करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाने शुक्रवारी दिले आहेत. गंमत म्हणजे शुक्रवारी सायंकाळीच कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता झाली. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने स्थानिक पातळीवर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पाहणी करण्यात आली. यानंतर सुनावणी घेण्यात येऊन त्रुटी आढळल्यानुसार हे आदेश बजावण्यात आले.

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेतली. नदीत मृत झालेल्या माशांची संख्या, कचऱ्याचे प्रमाण, पाण्यात येणारा फेस यासारख्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी संबंधित घटकांवर कारवाईचे निर्देश ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार नदी प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेऊन १ मार्च पाहणी केली. त्यानंतर राजाराम कारखान्याची वैयक्तिक सुनावणी घेण्यात आली.

या पाहणीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये आठ इंची पाईप लाईनद्वारे नदीचे पाणी येत असल्याचे व ते पाणी प्रक्रिया पूर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीमध्ये सौम्यकरण करण्यासाठी वापरताना आढळले. क्लॅरिफायरमध्ये सौम्यीकरण करताना आढळले. ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टिममध्ये प्रक्रिया पूर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीमधील पाणी घालून परिणाम बघितले असता केमिकल ऑक्सिजन डिमांड-७६९ व बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड-३८६ आढळून आले.

वायुविजन टाकीमधील एमएलएसएस १२०० ते १४०० इतके कमी आढळून आले. यामुळे कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले. कारखान्यास यापूर्वी प्रक्रिया केलेले पाणी (शेतासाठी) नागांव येथे (११ किलोमीटर) वाहून नेणारी पाईप लाईन गळती संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

कारखान्याचे व्यवस्थापन म्हणते..

कारखान्यामुळे नदीचे प्रदूषण होणार नाही याची काळजी कायमपणे घेतली जाते. यापूर्वीही प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेल्या नोटिसांना उत्तर दिले आहे. कारखान्याचा हंगाम संपला असल्याने उत्पादन बंद ठेवण्याचा प्रश्नच येत नसल्याचे कारखान्याच्या सूत्रांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Order to close Chhatrapati Rajaram Sahakari Sugar Factory at the end of the season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.