भानगडी करणाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करु नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:53+5:302021-08-26T04:25:53+5:30
कुरुंदवाड : निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून वारंवार आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी शहराला काय योगदान दिले आहे हे त्यांनीच आत्मपरीक्षण करावे. ...
कुरुंदवाड : निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून वारंवार आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी शहराला काय योगदान दिले आहे हे त्यांनीच आत्मपरीक्षण करावे. नळ पाणीपुरवठा योजना ज्यांच्या काळात मंजूर झाली त्या रामचंद्र डांगे यांच्यामुळेच योजना रखडली आहे. आंदोलकांनी त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचे धारिष्ट्य दाखवावे. जयराम पाटील घराण्याला त्यागाचा वारस आहे. शिवसेनेत राहून भानगडी करणाऱ्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू नये, असा उपहासात्मक सल्ला शिवसेना माजी शहरप्रमुख राजू आवळे यांना शहर काँग्रेस अध्यक्ष विजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.
पाटील म्हणाले, शहरातील अतिक्रमणे नियमित व्हावेत यासाठी जयराम पाटील फौंडेशनच्या माध्यमातून अर्ज स्वीकारून त्याचा पाठपुरावा केला आहे. शिवसेनेचे आवळे पालिकेच्या प्रत्येक प्रश्नावरून आंदोलन करत राजकीय स्टंटबाजी करत आहेत. अतिक्रमण नियमित करण्यासाठीच एकतरी अर्ज घेतला आहे का, त्यांच्या हटवादी आंदोलनामुळे शहरातील मिळकतधारकांना जादा कराचा भुर्दंड भोगावा लागत आहे. केवळ पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना बदनाम करून स्वत: नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहत आहेत.
शहराच्या विकासासाठी गेल्या दोन वर्षांत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला आहे. शहरातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्कऑर्डरही दिली आहे. पावसाळा संपताच १५ सप्टेंबरनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगून आंदोलकांनी रोज आंदोलन केले तरी आमच्यावर काही फरक पडत नाही. काम करणारे कोण आहेत याची जाणीव जनतेला असल्याचे त्यांनी सांगितले.