पावसाची दडी; खरिपाने मान टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:26 AM2017-08-14T00:26:23+5:302017-08-14T00:26:26+5:30

Rain; Well credited with dignity | पावसाची दडी; खरिपाने मान टाकली

पावसाची दडी; खरिपाने मान टाकली

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वरुणराजाने गेले आठ-दहा दिवस दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकल्या असून, जिल्ह्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवरील भात, भुईमूग व नागलीची पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. ‘आज पाऊस येईल, उद्या येईल,’ या आशेवर शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले असून, वरुणराजा हुलकावणी देत असल्याने चिंंता वाढली आहे.
यंदा मान्सूनने वेळेत व चांगली सुरुवात केल्याने खरीप पिकांची उगवण चांगली राहिली. जूनमध्ये पावसाला ताकद लागली नसली तरी जुलै महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. जुलैअखेर वार्षिक सरासरीच्या ४४ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांची वाढ जोमात झाली. उर्वरित दोन-अडीच महिन्यांत चांगला पाऊस होईल, असे अपेक्षित होते. आॅगस्ट उजाडला आणि पावसाने दडी मारली. पहिले दोन-तीन दिवस अधूनमधून का असेना पण सरी कोसळत होत्या; पण गेले आठ-दहा दिवस पावसाने अक्षरश: पाठ फिरविल्याने पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील भात, नागली व भुईमूग ही पिके करपू लागल्याने शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. गेले दोन महिने मशागत व महागडी खते घालून पोटच्या पोरासारखे सांभाळलेली पिके डोळ्यांदेखत करपू लागली आहेत.
आज पाऊस येईल, उद्या येईल, या आशेवर शेतकरी आहे. दिवसभर आकाशात ढग गोळा होतात; पण पाऊस हुलकावणी देत असल्याने चिंता वाढली आहे. हाता-तोंडाला आलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.
नदी, विहिरीत पाणी; पण वीज गायब
पावसाळ्यात साधारणपणे सप्टेंबरपर्यंत नदी व विहिरीवरील विद्युत पंपांचा वीजपुरवठा बंद असतो. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापासून पाऊस ओढ धरत असल्याने त्यानंतरच पिकांना पाण्याची गरज भासते; पण यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. नदी, विहिरीत पाणी आहे; पण काही ठिकाणी वीज नसल्याने पिके करपू लागली आहेत.
दोन वर्षांपूर्वीची आठवण!
दोन वर्षांपूर्वी पावसाने अशीच हुलकावणी दिली होती. जोमात वाढ होण्याच्या वेळेलाच पाऊस गायब झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासारखा अनुभव यंदा शेतकºयांना येऊ लागला आहे.
पोषक हवामानामुळे किडींचे आक्रमण
किडीला पोषक असेच हवामान असल्याने सर्व पिकांवर विविध कीडरोगांनी आक्रमण सुरू केले आहे. सोयाबीनवर पाने खाणारी अळी, भाजीपाला व भुईमुगावर पांढºया माशी व फुलकिडीचा प्रादुर्भाव, तर भातावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसत आहे.
‘आॅक्टोबर हिट’चा अनुभव
पावसाने दडी मारलीच, पण तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्याने अंग करपू लागते. रविवारी दिवसभर सरासरी २८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. उद्या, मंगळवारी ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याचा आहे.
तुलनात्मक पाऊस (मि.मी.), कंसात टक्के
तालुका १३ आॅगस्ट २०१६ १३ आॅगस्ट २०१७
हातकणंगले ४८१ (५९) २२७ (२७)
शिरोळ ४५५ (११८) १४९ (३८)
पन्हाळा १४६२ (१०३) ८३० (५८)
शाहूवाडी १९१९ (१२४) १२३० (७९)
राधानगरी १५०१ (४२) ११४१ (३२)
गगनबावडा ३१७०(५६) २१११ (३७)
करवीर ८६१ (१०८) ४०८(५१)
कागल ९८३ (१५१) ५२० (८०)
गडहिंग्लज ६८६(८७) ३३७ (४३)
भुदरगड ११२६ (८३) ७९४ (५९)
आजरा १५०३ (८४) ९४५ (५२)
चंदगड १४८१ (५६) ११७७ (४५)
एकूण १३०२ (७३) ८२२ (४६)

Web Title: Rain; Well credited with dignity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.