पावसाने १६ गावे टँकरमुक्त
By admin | Published: September 19, 2015 11:55 PM2015-09-19T23:55:11+5:302015-09-19T23:58:22+5:30
नागरिकांना दिलासा : १६ टँकर घटले; ५० टँकर सुरु
सांगली : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे ६१ पैकी सोळा गावे टँकरमुक्त झाली आहेत. त्याचबरोबर टँकरची संख्याही ६१ वरुन आता ५० वर आली आहे.
आॅगस्ट महिना पूर्णपणे पावसाविना गेल्याने सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली होती. हळूहळू ही संख्या ६१ वर पोहोचली होती. गेल्या चार ते पाच दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषत: कवठेमहांकाळ, जत व खानापूर या दुष्काळी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने या तालुक्यातील टँकरची संख्या कमी झाली आहे. अनेक तलावांमध्ये पाणी आल्याने पाणी पातळी वाढल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये टँकरची संख्या ६६ वर पोहोचली होती, आता गेल्या दोन दिवसात टँकरची संख्या कमी होऊन ५० झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी टँकरने १ लाख ६० हजार लोकसंख्येला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता आता यामधील सुमारे तीस हजार लोकसंख्या आता कमी झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ३७ विहिरी व ५१ बोअरही अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)