राजाराम कारखाना निवडणूक: वाढलेल्या टक्केवारीने वाढली निकालाची हुरहुर, दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:49 PM2023-04-24T12:49:57+5:302023-04-24T12:50:22+5:30

या निवडणुकीत यंत्रणा राबवण्यापासून, जेवणावळी व प्रत्यक्ष रोख रकमेचे वाटप याचा विचार केला असता तेवढ्या रकमेतून नवा कारखाना उभा राहिला असता, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केली

Rajaram Karkhana Election: Results hyped by increased percentage, claims of victory by both parties | राजाराम कारखाना निवडणूक: वाढलेल्या टक्केवारीने वाढली निकालाची हुरहुर, दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

राजाराम कारखाना निवडणूक: वाढलेल्या टक्केवारीने वाढली निकालाची हुरहुर, दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

googlenewsNext

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी ९१.१२ टक्के मतदान झाल्याने निकालाबद्दलची हुरहुर कमालीची वाढली आहे. गत निवडणुकीत सरासरी नव्वद टक्के मतदान झाले होते. दोन्ही बाजूंकडून सर्रास झालेले पैशाचे वाटप, प्रत्येक मतदार बाहेर काढण्यासाठी लागलेली यंत्रणा, प्रचारात उठलेली राळ आणि बोगस मतदान रोखण्यात आलेले यश यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस दिसली. सभासदांच्या मतांचा कौल मात्र मंगळवारीच स्पष्ट होईल.

ही निवडणूक गेली वर्षभरापासून गाजते आहे. सुरुवातीला ती अपात्र सभासदांच्या लढ्यामुळे गाजली. त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. त्यानंतर विरोधी आघाडीचे तगडे उमेदवार अपात्र ठरण्यावरून गाजली. ती लढाईही उच्च न्यायालयापर्यंत गेली. या दोन्ही लढ्यांत सत्ताधारी महादेवराव महाडिक यांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे आता प्रत्यक्ष मतपेटीतील लढाई कुणाच्या बाजूने कौल देते याबद्दल अंदाज वर्तवणे मुश्कील झाले आहे.

राजाराम कारखान्याची सत्ता ही महाडिक गटाकडे राहिलेली जिल्हा पातळीवरील एकमेव व महत्त्वाची सत्ता आहे. विधान परिषद, विधानसभा, गोकुळ आणि लोकसभेला पाठोपाठ पराभव झाल्यानंतर महाडिक गट जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफुटवर गेला; परंतु राज्यसभेला आकस्मिकपणे धनंजय महाडिक यांना भाजपने संधी मिळाली व पुन्हा या गटाला उभारी आली.

पुढे राज्यात सत्तांतर झाल्याचा फायदाही राजारामच्या निवडणुकीत सभासद व उमेदवार अपात्र प्रकरणात सत्तारूढ गटाला झाला. त्यांच्या दृष्टीने राजारामची सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनीही सर्व पातळ्यांवर उतरून ही निवडणूक लढवली. बऱ्याचदा लोक कारखान्याची सत्ता व विधानसभा किंवा अन्य निवडणुकीतील यश याची फारच चौकसपणे निवड करतात. गेल्या २८ वर्षांत महाडिक यांचा दबदबा राहिला. त्यामुळे त्यांच्याशी जोडलेले लोक कितपत बाजूला जातात यावरच गुलाल ठरणार आहे.

निवडणूक कोणतेही असो, ती सतेज पाटील यांनी एकदा अंगावर घेतली की मग मागेपुढे पाहायचे नाही. तिला भिडायचे याचा अनुभव लोकसभा व गोकुळच्या निवडणुकीतही आला होता. तशीच यंत्रणा त्यांनी या निवडणुकीत राबवली. को-जन, डिस्टलरी प्रकल्प, विस्तारीकरण, उसाला दर, कारखान्याचे बकालपण, सभासदांना मिळणारी वागणूक हे मुद्दे निवडणुकीत ऐरणीवर आणून त्यांनी मतदारांच्या भावनेला हात घातला.

तगडे उमेदवार अपात्र ठरल्याने या निवडणुकीत त्यांच्या पॅनलमध्ये गावपातळीवरील सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली. वाशीसारख्या एकाच गावांत तीन उमेदवार द्यावे लागले. त्यामुळे गावे व तगडे उमेदवार यांचा समतोल साधता आला नाही हे खरे असले तरी त्यांनी सतेज पाटील हेच उमेदवार आहेत, असे वातावरण निर्माण करण्यात यश मिळवले. त्यांची व्यक्तिगत राबणूक हीच लढतीत हवा निर्माण करणारी ठरली. मयत मतदान होणार नाही याची दक्षता घेतली. हातकणंगले तालुक्यात विनय कोरे यांनी एका सभेत भाषण केले; परंतु ते सक्रिय होणार नाहीत याची व्यवस्था केली. सर्जेराव माने यांचे बळ, गोकुळची सत्ता सोबत होती. अशा अनेक जोडण्या लावल्याने त्यांना विजयाचा पुरता आत्मविश्वास आहे.

नवा कारखाना झाला असता...

या निवडणुकीत यंत्रणा राबवण्यापासून, जेवणावळी व प्रत्यक्ष रोख रकमेचे वाटप याचा विचार केला असता तेवढ्या रकमेतून नवा कारखाना उभा राहिला असता, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केली. अगोदर एका गटाने पाच हजार दिले, ते दुसऱ्या गटाला समजल्यावर त्यांनी दहा दिले. मग पहिल्या गटाने आणखी दहा हजार मताला दिले असे अनेक गावांत घडले. मतदारांनी दोघांकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे पैशाचा प्रभाव पडतो की, लोक कारभार पाहून जागरूकतेने मतदान करतात यावरही निकाल ठरेल. कुंभी-कासारी, राजाराममध्ये जे घडले ते ऐकून निवडणूक होणाऱ्या बिद्री, भोगावतीसारख्या इतर कारखानदारांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.

Web Title: Rajaram Karkhana Election: Results hyped by increased percentage, claims of victory by both parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.