राजाराम कारखान्याच्या विस्तारीकरणासह वीज निर्मिती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:36+5:302021-02-07T04:23:36+5:30
कोल्हापूर : छत्रपती राजाराम साखर कारखान्याची गाळपक्षमता साडेतीन हजार मे. टन प्रतिदिनवरून पाच हजार करण्यात येणार असून, सहवीज निर्मिती ...
कोल्हापूर : छत्रपती राजाराम साखर कारखान्याची गाळपक्षमता साडेतीन हजार मे. टन प्रतिदिनवरून पाच हजार करण्यात येणार असून, सहवीज निर्मिती प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
शासनाने वीज खरेदीचा दर यापूर्वी निश्चित न केल्याने २०१८/१९ च्या वार्षिक सभेमध्ये सहवीज प्रकल्प आणि विस्तारीकरण स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, शासन चांगला वीज खरेदी दर देण्याच्या विचारात असल्याने १८.५ मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पाच हजार मेट्रिक टनांपर्यंत गाळप क्षमता वाढविण्यात येणार असून, यासाठी आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामुळे ८ ते ९ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचे गाळप वेळेत करणे शक्य होणार आहे.
कारखान्याच्या संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण, छत्रपती राजाराम ॲप, ऊस विकास अभियान, विविध अनुदान योजना सुरू केल्या असून, हे नवे निर्णय सभासदांच्या प्रगतीस कारणीभूत ठरतील असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, उपाध्यक्ष वसंत बेनाडे यांच्यासह संचालक उपस्थित होते.