हातकणंगलेतील जिल्हा परिषद मतदारसंघाची पुनर्रचना होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2016 10:50 PM2016-05-02T22:50:45+5:302016-05-03T00:50:19+5:30
ज्या गावचे रहिवाशी आहोत त्या समावेश असलेल्या गावांतूनच जिल्हापरिषद किंवा पंचायत समिती लढवण्याचा आनंद कार्यकर्त्यांना मिळणार
आयुब मुल्ला -- खोची -हातकणंगले तालुक्यातील शिरोली व हुपरी गावांना नगरपंचायत होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हापरिषद मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. यातून ही दोन गावे वगळल्याने किमान एकतरी मतदारसंघ कमी होईल. अकरा ऐवजी दहा मतदार संघ होतील. साहजिकच पुनर्रचनेचा फायदा गृहीत धरून मतदारसंघाचे आखाडे बांधले जात आहेत. इच्छुकांनी त्यादृष्टीने जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे अकरा जिल्हा परिषद मतदारसंघ हातकणंगले व करवीर तालुक्यात आहेत. त्यामुळे प्रमुख पदाधिकारी होण्यात याच तालुक्यातील कार्यकर्ते अग्रेसर असतात. पण या दोन्ही तालुक्यांची भौगोलिक रचना आता मतदारसंघामुळे बदलण्याची शक्यता आहे. जर हद्दवाढ झाली तर करवीरची रचनाच व्यापक प्रमाणात बदलेल पण सध्यातरी याबाबत ठोस असे काही दिसत नाही. याउलट हातकणंगले तालुक्यातील शिरोली, हुपरी या मोठ्या गावांना नगरपालिका मंजुरीचे संकेत शासनाने दिले आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच तसा निर्णय होणार आहे, असे समजते. त्यामुळे सर्वच पक्षांचे इच्छुक आपल्या सोयीनुसार मतदारसंघ कसा बसेल अशी प्राथमिक चर्चा करू लागले आहेत. दहा वर्षांपूर्वी झालेल्या पुनर्रचनेमुळे बहुतांश प्रस्थापितांची अडचण झाली होती. आपला हक्काचा मतदारसंघ सोडून दुसरीकडून निवडणूक लढवावी लागली. परंतु आता मात्र, पुन्हा पुनर्रचना होणार हे निश्चित आहे. आपण ज्या गावचे रहिवाशी आहोत त्या समावेश असलेल्या गावांतूनच जिल्हापरिषद किंवा पंचायत समिती लढवण्याचा आनंद कार्यकर्त्यांना मिळणार आहे.
त्यामुळे जुन्या जनसंपर्काचा, गटाच्या बांधणीचा, पक्षीय प्रभावाचा उपयोग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्वीसारखे पक्षीय राजकारण असेलच परंतु नेत्यांच्या बिघाडीमुळे स्वतंत्र आघाड्याही निर्माण होतील.
यामध्ये अनेक पक्षांचे कार्यकर्ते असतील. भक्कम आघाडी तालुक्याच्या पश्चिम भागात बांधण्याचे काम किंबहुना चाचपणी सुरू आहे. चर्चाही सुरू आहे. त्यास प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पक्षीय संघर्षाबरोबरच आघाडीतही निवडणुकीच्या लढाई होणार आहेत.