सीपीआरमध्ये नातेवाइकांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2015 01:22 AM2015-11-04T01:22:05+5:302015-11-04T01:22:19+5:30

गॅस गळती : कारखाना मालकासह तिघांना अटक; पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची भेट

Relatives resentment in CPR | सीपीआरमध्ये नातेवाइकांचा आक्रोश

सीपीआरमध्ये नातेवाइकांचा आक्रोश

Next

कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगर येथे क्लोरीन गॅस गळतीमुळे लक्ष्मीबाई पांडुरंग माने यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने नातेवाइकांच्या आक्रोश व संतापाने सीपीआर परिसर हादरून गेला. माने यांच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सुमारे तीन तास हा गोंधळ सुरूच होता.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, आयुक्त पी. शिवशंकर, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी सीपीआरमध्ये नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी डॉ. शर्मा यांनी संबधित घटनेप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारखाना मालक प्रशांत सर्जेराव कांबळे (वय ४०), सुबीर अत्तार (३०), सूरज खाडे (३५, सर्व रा. उद्यमनगर) यांना अटक केल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, अचानक रुग्ण दाखल झाल्याने सीपीआरमधील प्रशिक्षित डॉक्टरांची धांदल उडाली. या घटनेची माहिती समजताच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद अपघात विभागात आले. निपचित पडलेल्या लक्ष्मीबाई यांची तपासणी केली असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. माने यांच्या नातेवाइकांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. त्यांची मुलगी आशा रेनके, जावई चंद्रकांत रेनके व नातेवाईक सीपीआरमध्ये आले. लक्ष्मीबार्इंच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांना मानसिक धक्का बसला. त्यानंतर अन्य रुग्णांचे नातेवाईक तेथे आल्याने गर्दी होऊन गोंधळ उडाला.
शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, राजारामपुरीचे निरीक्षक अमृत देशमुख फौजफाट्यासह सीपीआरमध्ये आले. त्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सीपीआरमध्ये आमदार अमल महाडिक यांनीही रुग्णांची विचारपूस केली. दरम्यान, लक्ष्मीबार्इंचा मृत्यू डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मुलगी आशा हिने केला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना विचारणा केली असता त्यांनी उपचारापूर्वीच लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यावेळी नातेवाइकांनी डॉ. रामानंद यांना धारेवर धरले. त्यामुळे तेथे गोंधळ उडाला.
तो तरुणही बेशुद्ध
लक्ष्मीबाई माने यांच्या पतीचे २५ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. मुलगी आशा व बहिणीची मुलगी तेजस्विनी सुपनेकर यांना लहानाच्या मोठ्या केल्या. घरी मुलगी, जावई चंद्रकांत रेनके, त्यांची दोन मुले निशा, विशाखा व तेजस्विनी असे राहतात. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलगी, जावई व तेजस्विनी नोकरीवर गेले. मुले शाळेला गेली होती. त्यामुळे घरी एकट्याच असलेल्या लक्ष्मीबाई दुपारी झोपल्या होत्या. घटनेच्या शेजारीच लक्ष्मीबाई यांचे घर आहे. त्या एकट्या घरी असल्याचे कपिल मुदगल याच्या लक्षात आले. त्याने तातडीने दरवाजा मोडून आतमध्ये पाहिले असता लक्ष्मीबाई बेशुद्ध पडलेल्या त्याला दिसल्या. त्यांना रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, वायूचा उग्र वास या परिसरात पसरल्याने कपिल मुदगल यालाही उलट्यांचा त्रास होऊन तो ही बेशुद्ध पडला. त्यालाही खासगी रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)


तोंडावर रुमाल बांधून मदतकार्य
दुर्घटना घडल्यानंतर परिसरातील काही सामाजसेवकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या तोंडावर रुमाल बांधून धाडसाने परिसरातील घरांची झडती घेत घरात अडकलेले नागरिक, वयोवृद्ध यांना बाहेर काढून रुग्णालयाकडे पाठविले. या मोहिमेत रशीद सांगलीकर, निखिल गायकवाड, कपिल मुदगल, संजय गायकवाड, सतीश भोसले, सतीश ओसवाल, आदींनी मतदकार्य राबविले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनीही ब्रिदिंग आॅपरेटिंग किट वापरून परिसरातील घरात कोणी अडकले नाही ना, याची तपासणी केली. त्यावेळी त्यांना दोन वृद्ध महिला झोपलेल्या स्थितीतच बेशुद्ध असल्याचे दिसून आले. त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले.
गॅस बराच वेळ हवेत
क्लोरीन गॅस हा मुख्यत: पाणी शुद्धीकरणासाठी वापरला जातो. हा वायू जड असल्याने तो हवेत मिसळल्यास किमान पाच फूट उंचीपर्यंत बराच वेळ तरंगत राहतो. त्यामुळे गळती झालेल्या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तींना त्यांची बाधा लगेच होते. रात्री उशिरापर्यंत हा वायू हवेत तरंगत असल्याने त्याचा त्रास लोकांना होत होता.
परिसरातील घरे, दुकाने उघडली
दुर्घटनेनंतर पळापळ झाली. त्यावेळी काहींनी आपली घरे उघडीच टाकली, तर काहींनी घरे बंद करून परिसर सोडला. तर परिसरातील कारखाने, दुकानदारांनी आपले दुकाने तातडीने बंद करून पलायन केले होते; पण काही वेळाने वायू गळती थांबली. तसेच हवेत पसरलेल्या वायूची तीव्रता झाल्यानंतर कारखाने, दुकानमालक पुन्हा आल्यानंतर त्यांना बंद केलेल्या व्यवसायाचे शटर उघडण्यास पोलिसांनी भाग पाडले. त्यामुळे आत अडकलेला वायू पुन्हा खुला होऊन धोका कमी झाला.

सुवर्णा विलास चौगुले (वय ४०, रा. कसबा बावडा), पद्मा नागनाथ खापरे (५०, म्हाडा कॉलनी), मधू रमेश शिंदे (४७), वैजयंती उमेश शिंदे (१६), दिलीप शामराव वासुदेव (४७), पूजा आनंद शिंदे (३७), लक्ष्मी दिनकर गायकवाड (७०), लक्ष्मीबााई पांडुरंग माने (६८), राजू महादेव कोळी (३९), कपिल सुभाष मुदगल (३३), विनोद उदय गायकवाड (४०), पूजा तनूज गायकवाड (२३), साक्षी सुदीप मुदगल, (सर्व रा. उद्यमनगर), सुजाता सुधाकर मिस्त्री (५३), अलका अनिल कांबळे (३६), सुरेखा सुनील कांबळे (३४, सर्व रा. यादवनगर), सारिका सतीश कदम (२८), वहिदा अस्लम मुल्ला (३६), बेबी राजू पोळ (३६), सारिका महादेव खंदारे (३२, सर्व रा. जवाहरनगर), ज्योती रमेश माने (३१, रा. मंडलिक वसाहत), वंदना महादेव सुतार (३९, रा. संभाजीनगर), अनिता प्रकाश मगदूम (४६, रा. नेहरूनगर), कांता विलास कांबळे (४०, रा. राजेंद्रनगर), राजू महादेव कोळी (३० रा. टिंबर मार्केट), तानाजी शिवाजी जाधव (४०, रा. कळे, ता. पन्हाळा), पंचम राजन यादव (२८, रा. कोल्हापूर), संभाजी केरबा साठे (४०, रा. विक्रमनगर), अनिल राजाराम माने (३२, रा. फुलेवाडी), संदीप विलास दळवी (२७, रा. उपवडे, ता. करवीर), रविना राजू भजनावळे (४१, रा. शास्त्रीनगर), शीतल सुरेश आरडे (३९), रेखा मुकुंद लोहार (४२, दोघे, रा. कळंबा, ता. करवीर), अशोक शिवा साठे (४३, रा. शिंगणापूर, ता. करवीर), महापालिका अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी कांता यशवंत बांदेकर (४०, रा. फुलेवाडी), शिवाजी शंकर नलवडे (४५, प्रतिभानगर), प्रवीण अरुण ब्रह्मदंडे (२२, रा. बापूरामनगर), विष्णू राजाराम सरनाईक (५०, रा. शिवाजीपेठ), काशिनाथ बसलिंग स्वामी (५५, रा. मंगळवार पेठ), कृष्णात शिवाजी मिठारी (३०, रा. ब्रिद्री, ता. राधानगरी)


पोलिसांची उशिरा हजेरी
दुर्घटना दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांतच महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केला. पाठोपाठ घटनेचे आणखी तीन बंब येथे मागविले. त्यांनी ही गॅस गळती रोखली. तसेच परिसरातील घरात अडकलेल्यांना शोधून काढून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी पाठविले. त्यासाठी सात रुग्णवाहिकाही मागविल्या. पोलिसांची हजेरी मात्र भलतीच उशिरा झाली. दुर्घटना घडल्यानंतर तासानंतर दोन महिला पोलीस कर्मचारी दाखल झाल्या. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने पोलीस निरीक्षक भरतकुमार राऊत, अमृत देशमुख, आर. आर. पाटील फौजफाट्यांसह घटनास्थळी आले.

पोलिसांची उशिरा हजेरी
दुर्घटना दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांतच महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केला. पाठोपाठ घटनेचे आणखी तीन बंब येथे मागविले. त्यांनी ही गॅस गळती रोखली. तसेच परिसरातील घरात अडकलेल्यांना शोधून काढून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी पाठविले. त्यासाठी सात रुग्णवाहिकाही मागविल्या. पोलिसांची हजेरी मात्र भलतीच उशिरा झाली. दुर्घटना घडल्यानंतर तासानंतर दोन महिला पोलीस कर्मचारी दाखल झाल्या. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने पोलीस निरीक्षक भरतकुमार राऊत, अमृत देशमुख, आर. आर. पाटील फौजफाट्यांसह घटनास्थळी आले.

Web Title: Relatives resentment in CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.