काॅंग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीला पुन्हा उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:40+5:302021-08-17T04:28:40+5:30
कोल्हापूर : काॅंग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात बजावलेल्या कामगिरीला स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा उजाळा मिळाला. निमित्त होते कोल्हापूर जिल्हा काॅंग्रेस कमिटीमध्ये आयोजित चित्र ...
कोल्हापूर : काॅंग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात बजावलेल्या कामगिरीला स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा उजाळा मिळाला. निमित्त होते कोल्हापूर जिल्हा काॅंग्रेस कमिटीमध्ये आयोजित चित्र प्रदर्शनाचे. या प्रदर्शनामध्ये काॅंग्रेसच्या विविध नेत्यांनी बजावलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.
जिल्हा काँग्रेसच्यावतीने सभागृहात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. काँग्रेसच्या स्थापनेपासून स्वातंत्र्यपूर्व काळात केलेले जुलमी ब्रिटीश राजवटीविरोधातील सत्याग्रह, आंदोलन आणि अधिवेशन, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तत्कालीन सर्व काँग्रेस चळवळीतील नेते आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान याची सचित्र माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे. याठिकाणी स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहणारा ‘व्यर्थ न हो बलिदान’ अशा आशयाचा भव्य फलक आणि सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.
यावेळी काॅंग्रेसच्या योगदानाची माहिती देणारी चित्रफीतदेखील दाखविण्यात आली. जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील, महिला व बालकल्याण सभापती रसिका पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संगमनेर येथील जय हिंद युवा मंचच्या विद्यार्थिनी, संगमनेर जिल्हा काॅंग्रेसच्यावतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या सहकार्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आलेल्या एक ट्रक जीवनावश्यक वस्तू पालकमंत्री पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. काँग्रेस नेहमीच संकटाच्या काळात मदतीसाठी हात पुढे करते, असे सांगत संगमनेर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीबद्दल पाटील यांनी आभार मानले.
१६०८२०२१ कोल काॅंग्रेस कमिटी ०२
संगमनेर जिल्हा काॅंग्रेसच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी पाठविलेले साहित्य पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे रविवारी सुपूर्द करण्यात आले.