नदी उशाला, कोरड घशाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:06+5:302021-02-06T04:42:06+5:30
काेल्हापूर : ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ अशी दयनीय स्थिती ब्रह्मपुरी पिकनिक पाॅइंट सेंटर येथील उद्यानाची झाली आहे. पंचगंगा ...
काेल्हापूर : ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ अशी दयनीय स्थिती ब्रह्मपुरी पिकनिक पाॅइंट सेंटर येथील उद्यानाची झाली आहे. पंचगंगा नदीलगत असतानाही येथील उद्यानात मुबलक पाणी नसल्यामुळे वृक्ष सुकून जात आहेत. उद्यानाला पाणी मिळावे म्हणून टाकलेल्या पाण्याच्या पाइपलाइनवर अनेकांनी कनेकश्न घेतल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने मात्र, गंधारीची भूमिका घेतली आहे.
कोल्हापूर महापालिकेची शहरात ठिकठिकाणी उद्याने आहेत. शिवाजी पूल परिसरातील ब्रह्मपुरी पिकनिक पाॅइंट येथील उद्यानही यापैकी एक आहे. पंचगंगा स्मशानभूमी आणि येथील उद्यानाला मुबलक पाणी मिळावे, या उद्देशाने स्मशानभूमी परिसरात १५ वर्षांपूर्वी बोअर घेतला. या उद्देशालाच हारताळ पासण्याचे काम सध्या सुरू आहे. बोअरमधील पाइपलाइनवर कनेक्शन घेऊन पाण्याचा वापर परिसरातील नागरिक खर्चासाठी करतात. गोरगरिबांना पाणी देणे गैर नाही. मात्र, धनदांडगेही याचा वापर करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्राधान्यक्रमाने स्मशानभूमी आणि उद्यानाला पाणी मिळाले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. बोअरमधील पाण्यासाठी १०० पेक्षा जास्त कनेक्शन झाले आहेत. बांधकाम, जनावरे धुण्यासाठी बेसुमार पाण्याचा वापर होत आहे. परिणामी, उद्यानासाठी कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. किंबहुना मिळतही नाही. बोअरमधील पाणी उपसा करण्यासाठी विजेचाही वापर केला जात असून महापालिकेवर आर्थिक भार पडत आहे. पाणी कमी प्रमाणात मिळत असल्याबाबत उद्यानातील कर्मचाऱ्यांनी महापालिकेचे जल अभियंता यांना पत्र पाठवले होते. मात्र, त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
फोटो : ०४०२२०२१ कोल पिकनिक पॉइंट न्यूज
ओळी : कोल्हापुरातील ब्रह्मपुरी पिकनिक पाॅइंट येथील उद्यानात पाण्याअभावी वृक्ष सुकून जात आहेत.