कोल्हापुरात शनिवारी ‘सहकार वाचवा परिषद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:19+5:302021-08-26T04:27:19+5:30
कोल्हापूर : केंद्रातील अन्यायी कृषी कायद्याला विरोध हा कायम राहणारच आहे; पण जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेत पर्याय द्यायचा म्हटला, तर ...
कोल्हापूर : केंद्रातील अन्यायी कृषी कायद्याला विरोध हा कायम राहणारच आहे; पण जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेत पर्याय द्यायचा म्हटला, तर सहकाराशिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही; पण त्याचेही स्वतंत्र मंत्रालय उभारून केंद्र सरकारकडून राजकीयीकरण केले जात असल्यानेच चांगल्या कामासाठी वापर करावा, यासाठी राज्यातील समविचारी संघटना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या झेंड्याखाली एकत्र आल्या आहेत. त्यांनी येत्या शनिवारी (दि.२८) कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रासाठी सहकार वाचवा परिषद घेऊन प्रदीर्घ लढ्याचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
दसरा चौकात मुस्लीम बोर्डिंगमध्ये दुपारी १२ वाजता या परिषदेचे उद्घाटन प्रा. आनंद मेणसे व गोकूचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत दिवसभर सध्याची परिस्थिती, केंद्र सरकारची बदलणारी धोरणे, नवीन स्थापन झालेले मंत्रालय, सहकारातील पर्याय, अशा अनेक पैलूंवर चर्चा होणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागातील जाणकारही मांडणी करणार आहेत. ठरावदेखील केले जाणार आहेत, अशी माहिती किसान सभेचे नामदेव गावडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
या परिषदेचे संयोजक म्हणून कुंभी साखर कारखाना, शेकाप, जनता दल, आम आदमी पार्टी, सत्यशोधक किसान सभा, राष्ट्र सेवा दल असणार आहे. या बैठकीला वसंतराव पाटील, संदीप देसाई, बाबूराव कदम, बाबासाहेब नदाफ, दिलीपकुमार जाधव, रवींद्र जाधव, संभाजी जगदाळे, संग्राम माने उपस्थित हाेते.