कारखान्यांना मदतीचे आधी ठरले लाभार्थी; मग धोरण, सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार

By विश्वास पाटील | Published: December 11, 2022 06:10 PM2022-12-11T18:10:39+5:302022-12-11T18:11:15+5:30

शंभूराज देसाई यांनी बाळासाहेब देसाई कारखान्यास व  शेतकरी साखर कारखान्यास ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

Shambhuraj Desai has announced assistance of Rs 34 crore to Balasaheb Desai Factory and Shetkari Sugar Factory   | कारखान्यांना मदतीचे आधी ठरले लाभार्थी; मग धोरण, सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार

कारखान्यांना मदतीचे आधी ठरले लाभार्थी; मग धोरण, सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार

Next

कोल्हापूर: राज्यातील सत्तारूढ आघाडीच्या दोन नेत्यांच्या कारखान्यांना शासनाने अगोदर लाभ दिला आहे व मग त्याचे निकष निश्चित करून प्रस्ताव मागवल्याचे प्रकरण समोर आले आहे. शासनाने शुक्रवारी त्यासंबंधीचा शासनादेश काढला असून, त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण (जि. सातारा) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यास व भाजपचे किल्लारी (जि.लातूर)चे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघातील शेतकरी साखर कारखान्यास ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे शंभूराज देसाई हे मुख्यमंत्र्यांचे, तर पवार हे उपमुख्यमंत्र्यांचे उजवे हात मानले जातात.

कारखान्यांची प्रतिदिन गाळप क्षमता १२५० वरून २५०० करण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्याचे निकष या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या निकषानुसार जे कारखाने पात्र ठरतील त्यांना भागभांडवल द्यायला हवे; परंतु इथे मात्र उलटेच झाले आहे. ज्या आदेशामध्ये निकष निश्चित केले आहेत, त्याच आदेशान्वये दोन कारखान्यांना आर्थिक मदत दिली आहे. याचा अर्थ या दोन कारखान्यांना सरकारला मदत द्यायचीच होती. ती त्यांनाच दिल्यावर ओरड होईल म्हणून त्यांना अगोदर मदत करून त्याला जोडूनच इतरांना मदतीचा शासन आदेश एकत्रितच काढला आहे. राज्यात सध्या १०० सहकारी व ९९ खासगी कारखाने सुरू आहेत. त्यापैकी १५ कारखाने हे १२५० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे आहेत. गाळप क्षमता कमी असल्याने साखर उत्पादन कमी आणि उत्पादन खर्च कमी या दूष्टचक्रात हे कारखाने सापडले आहेत. जुनाट यंत्रसामग्री, भरमसाठ कामगार भरती, भ्रष्टाचार, अपुरे खेळते भांडवल हीदेखील त्याची कारणे आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी कारखान्यांना शासकीय भागभांडवल देणे बंद केले. तो निर्णय बदलून आता कारखान्यांना मदत दिली जात आहे.

सहा निकष
भागभांडवल देण्यासाठी सहा निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्याचा विचार केल्यास पंधरापैकी फार कमी कारखान्यांना या योजनेचा लाभ होईल. हे कारखाने निकषामध्ये बसतात की नाही याची छाननी करण्याची जबाबदारी साखर आयुक्तांवर आहे..मग पाटण व किल्लारी कारखान्यांचे निकष अगोदरच कुणी तपासले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

शंभूराज यांचे कर्तृत्व..
लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना स्थापन होऊन पन्नास वर्षे झाली. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे या कारखान्याची सूत्रे वयाच्या १८ व्या वर्षी आली. गेली तीन तपे ते हा कारखाना चालवतात; परंतू त्यांना इतक्या वर्षांत त्याची गाळप क्षमता १ टनानेही वाढवता आली नाही. पाटणला ऊस कमी असला तरी कराड तालुका उसाचे आगर आहे; परंतु त्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलेले नाही. उंब्रजचा जयवंत शुगर हा खासगी कारखाना भोसले कुटुंबीयांनी अल्पावधीतच दणक्यात चालवला आहे आणि मंत्री देसाई आता सरकारी भांडवल मिळतेय म्हणून गाळप क्षमता वाढवत आहेत.

किल्लारीचा कारखाना बंदच
किल्लारीचा कारखाना नऊ वर्षांपासून बंद आहे. त्यावर सध्या प्रशासक आहे. तो सुरू व्हावा यासाठी आमदार पवार प्रयत्नशील आहेत. तो त्यांच्या मतदारसंघातील कारखाना आहे.


  

Web Title: Shambhuraj Desai has announced assistance of Rs 34 crore to Balasaheb Desai Factory and Shetkari Sugar Factory  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.