शिवसेनेचे आंदोलन...भाजपचा धीर!

By admin | Published: February 1, 2015 11:56 PM2015-02-01T23:56:15+5:302015-02-02T00:02:26+5:30

दोन्ही पक्षांतील दरी वाढतेय : आंदोलनातून भाजपवर दबावाचे राजकारण

Shiv Sena's movement ... BJP's courage! | शिवसेनेचे आंदोलन...भाजपचा धीर!

शिवसेनेचे आंदोलन...भाजपचा धीर!

Next

राजाराम लोंढे - कोल्हापूर -- सत्तेत असताना उसाच्या एफ.आर.पी.चा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने गेले महिनाभर सुरू केलेल्या आंदोलनामुळे भाजप पुरती गोंधळून गेली आहे. प्रमुख विरोधक शांत असताना, सत्तेतील मित्रपक्ष आक्रमक झाल्याने भाजपची कोंडी झाली आहे. मित्रपक्षाकडून दबावाचे राजकारण सुरू झाल्याने भाजपचे नेतेही आक्रमक झाले असून, कायदा हातात घ्याल तर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याने महायुतीतील संबंध ताणले आहेत.
गेली पंधरा वर्षे शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून सत्तारूढ दोन्ही कॉँग्रेसला अडचणीत आणले. संपूर्ण राज्यात आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करत दोन्ही कॉँग्रेसला सत्तेतून बाजूला केले. आता महायुतीचे सरकार आले आहे, पण भाजपने मित्रपक्षांना दुय्यम स्थान देण्यास सुरुवात केल्याने मित्र पक्ष आक्रमक होऊ लागला आहे. शिवसेनेला दिलेली दुय्यम खाती, इतर शासकीय नियुक्तींच्या वाट्यात शिवसेनेला ३० टक्केच ठेवल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
सत्तेचा मोबदलाही मिळत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती मित्रपक्षांनी आखली आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळालेले नाहीत, कारखान्यांना पॅकेज देण्यास केंद्र सरकार फारसे अनुकूल नाही, राज्य शासनाने ऊस खरेदी माफ करत थोडा दिलासा दिला असला तरी शॉर्ट मार्जिन मोठ्या प्रमाणात असल्याने येथे थेट केंद्रानेच मदतीचा हात देणे गरजेचे आहे. दोन महिने झाले ऊस तुटून पण पैसे मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. त्याच्या मनात साखर कारखानदारांबरोबरच सरकारबद्दल चीड निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या रोषाचे खापर आपल्या अंगावर फुटू नये, यासाठी आक्रमक होऊन आंदोलन हातात घेण्याचे आदेश थेट ‘मातोश्री’वरून आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी शिवसेनेने साखर सहसंचालक कार्यालय टार्गेट केले. शिवसैनिकांनी घातलेल्या गोंधळामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचारी भयभीत झालेले आहेत. त्यांनी ‘काम बंद’चा इशारा दिल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, सकाळी कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांना धीर दिला. सरकार तुमच्याबरोबर असल्याचे सांगत कायदा हातात घेऊन आंदोलन केले तर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी पोलीसप्रमुख व जिल्हाधिकाऱ्यांना देऊन शिवसेनेला शह दिला आहे.

विरोधक थंड...सत्तेतील आक्रमक!
साखरेच्या पडलेल्या दराचा मुद्दा घेऊन विरोधी कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसने आक्रमक आंदोलन हातात घेणे जनतेला अपेक्षित होते. पण साखरसम्राट हीच मंडळी आहेत, त्यामुळे ते थंड आहेत आणि सत्तेतील शिवसेना आंदोलन करत असल्याने नेमके सत्तेत कोण आणि विरोधक कोण हेच कळत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटू लागल्या आहेत.

एकाच दगडात दोन पक्षी
सध्या उसाचे पैसे मिळाले नसल्याने हाच मुद्दा घेत शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवलीच, पण त्याबरोबर सत्तेत असतानाही एकट्या भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शेतकऱ्यांमध्ये योग्य तो संदेश पोहोचवण्याचे काम केले आहे.

Web Title: Shiv Sena's movement ... BJP's courage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.