दीपोत्सवाचा सोहळा सहा दिवस

By Admin | Published: October 26, 2016 12:30 AM2016-10-26T00:30:46+5:302016-10-26T00:47:39+5:30

दुर्मीळ योग : प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व; स्वागताच्या लगबगीने घेतला वेग

Six days to celebrate the festival | दीपोत्सवाचा सोहळा सहा दिवस

दीपोत्सवाचा सोहळा सहा दिवस

googlenewsNext

कोल्हापूर : आपल्या आयुष्यातील ताण-तणाव, चिंता, संघर्ष विसरायला लावणारा, पणत्यांचा शीतल प्रकाश, आकाशकंदील, विद्युत माळांच्या आकर्षक रोषणाईने घरादाराला उजळून टाकणारा दीपोत्सव यंदा सहा दिवसांचा असणार आहे. त्याच्या स्वागताच्या लगबगीने आता वेग धरला आहे.
‘वर्षातला सर्वांत मोठा सण’ म्हणून दिवाळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंधकाराचा नाश करत घरोघरी समृद्धता, आनंद, मांगल्याची शिदोरी घेऊन येणाऱ्या या सणात धार्मिक, सांस्कृतिक विधी असतात. वसुबारस या शेती संस्कृती आणि बळिराजाविषयी आदर व्यक्त करणाऱ्या दिवसापासून ते धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सहा दिवसांभोवती दिवाळीचे महत्त्व अधोरेखित होते. काहीवेळा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येते, काही वेळा पाडवा आणि भाऊबीज एकाचदिवशी असते. त्यामुळे अनेकदा
दोन ते तीन दिवसांत दिवाळीचे सगळे महत्त्वाचे सोपस्कार पूर्ण होतात. यंदा मात्र ही दिवाळी तब्बल सहा दिवसांची असून हा तसा दुर्मिळ योग आहे. त्यामुळे उत्सवाचा अधिक आनंद घेता येईल. सणाच्या निमित्ताने आता घरोघरी बनविल्या जाणाऱ्या फराळाचा दरवळ सुटला आहे.

भारतीय संस्कृतीत शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पीक उगवणारी माती, शेतात राबणारा शेतकरी आणि त्यांच्याबरोबरीने काम करणारे बैल, दूधदुभतं देणारी गाय, म्हशी या मुक्या प्राण्यांविषयीचा आदर आणि प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे वसुबारस. या दिवसापासून दिवाळी सणाची औपचारिक सुरुवात होते.
धन्वंतरी ही आरोग्य देवता. धनत्रयोदशी हा दिवस देवता धन्वंतरी हिची जन्मतिथी म्हणून तिचे पूजन केले जाते. स्त्रिया यमराज प्रसन्न व्हावा म्हणून ‘यमदीप दान’ म्हणजे दक्षिण दिशेला दिवे लावतात. सायंकाळी व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीची कुबेर-विष्णूसह पूजा केली जाते. दागिने, हिशेबाच्या वह्या, चोपड्या यांची साळीच्या लाह्या, बत्तासे, धण्याच्या अक्षता, झेंडूच्या फुलांनी पूजा करतात. रोषणाई, फटाके, प्रसाद वाटप सोहळा असतो.
नरकचतुर्दशी दिवशी सूर्योदयापूर्वी सुवासिक तेल, उटण्याने अभ्यंगस्नान केले जाते. नवी वस्त्रप्रावरणे नेसून देवदर्शनासाठी लोक जातात. दीपोत्सवाच्या शुभेच्छा, फराळाचा आस्वाद, आतषबाजीचा आनंद सर्वजण लुटतात.

अश्विन आमावस्येला सायंकाळी घरी व व्यापार-उद्योगाच्या ठिकाणी लक्ष्मी-कुबेराची पूजा केली जाते. पूजेसाठी धणे, बत्तासे, झेंडूची फुले, नैवेद्याला पेढे, लाडू असा रिवाज आहे. या लक्ष्मीदेवतेकडे सर्वजण समृद्धी, ऐश्वर्य, भरभराटीसाठी प्रार्थना करतात.
बलिप्रतिपदा-पाडवा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणारा हा सण ‘दिवाळी पाडवा’ म्हणून ओळखला जातो. पती-पत्नीच्या नात्याचा गोडवा वाढवणारा, माहेरी आलेल्या मुली, जावयाच्या कौतुकाचा हा दिवस.
यमद्वितीया म्हणजे बहीण-भावाच्या स्नेहाचे प्रतीक असणारा दिवस. बहीण गोडधोड पक्वान्न करून भावाला जेऊ घालते. पंचारतीने ओवाळून त्याच्या मांगल्य, स्वास्थ्यासह दीर्घायुष्याची कामना करते. भाऊ-बहिणीला भेटवस्तू देतो. सासरी गेलेल्या, बहिणीची विचारपूस करणारा दिवस.

Web Title: Six days to celebrate the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.