दररोज मैदानावर खेळणाऱ्या मुलांना विशेष गुण
By Admin | Published: September 20, 2015 09:26 PM2015-09-20T21:26:33+5:302015-09-20T23:54:09+5:30
विनोद तावडे : मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी उपक्रम
सावंतवाडी : मैदानी खेळ आणि शिक्षणाची सांगड घालत विद्यार्थ्यांची नजर मोबाईलवरून हटविण्यासाठी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आठवड्याचे पाच दिवस प्रत्येकी एक तास मैदानी खेळात प्रावीण्य मिळविल्यास दहावीच्या गुणपत्रिकेत विशेष गुण देऊन दखल घेण्याचा विचार असल्याचे शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार राजन तेली, पुखराज पुरोहित, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काका कुडाळकर व पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षणात मैदानी खेळांची आवड लावण्यासाठी सरकार खास योजना आखत आहे. इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी दर दिवशी एक तास मैदानात घालवला पाहिजे. आठवड्यातील पाच दिवस दरदिवशी एक तास मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिकेत विशेष गुण देण्याचा विचार आहे, असे क्रीडामंत्री विनोद तावडे म्हणाले.
काँगेसने अनुदान मिळेल तेव्हा विनाअनुदानीत शाळांचा विचार करण्याचा निर्णय घेतला. पण, काही शाळांना अनुदान लाटण्यासाठीचेही निर्णय घेतले. त्यामुळे अनुदानीत व विनाअनुदानीत शाळांबाबत सरकार तारतम्य ठेवून निर्णय घेत आहेत. तसेच दहावीत चार टक्के नापास विद्यार्थ्यांना संधी देऊन त्यांच्या कौशल्यगुणांना वाव दिला जात आहे, असेही तावडे म्हणाले.
दोडामार्ग, वैभववाडी व कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजप व शिवसेना युती करून लढवावी, असा विचार आहे. युतीपेक्षा तिन्ही शहरांचा दर्जेदार विकास नगरविकास खात्याकडून व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहीन. या शहरांसह जिल्ह्याचा विकास साधताना राजकीय पक्षांपलीकडे जाऊन सर्वच पक्षांच्या नेतृत्वाने गांभीर्याने विचार करावा, आदर्श व दर्जेदार शहरे बनवावीत म्हणून नगरविकास खात्याने नगरपंचायत दर्जा दिला आहे.
शहरे बकाल होऊ नयेत तर विकास, शैक्षणिक दालने, पार्किंग व सांडपाणी व्यवस्थापन अशा स्तरावर योग्य नियोजन करून शहराचा विकास हेच सरकारचे धोरण आहे. यासाठी सिंधुदुर्गात विशेष प्रयत्न करून हे राबविण्यात येईल, असेही तावडे म्हणाले. (वार्ताहर)