स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रांत कार्यालयात निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:31+5:302021-03-13T04:44:31+5:30
इचलकरंजी : महाराष्ट्र सरकारने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकल्याच्या पार्श्वभूमीवर येथील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने विविध विभागांची परीक्षा लवकरात लवकर ...
इचलकरंजी : महाराष्ट्र सरकारने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकल्याच्या पार्श्वभूमीवर येथील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने विविध विभागांची परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशा मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले.
निवेदनात, २८ फेब्रुवारी २०२१ ला झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात सावळा-गोंधळ झाला आहे.
एका बेंचवर दोन-तीन विद्यार्थी बसविले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून पेपर सोडविणे, असे अनेक गैरप्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी तसेच पोलीस भरतीचे अर्ज भरून दोन वर्षे उलटली तरी अद्याप पेपर होऊन भरती झाली नाही. महापरीक्षा पोर्टलद्वारे वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात पै. अमृत भोसले, सिद्धू पिरगोंडे, श्रावण जाधव, गौतम कांबळे, अक्षय कलागते, आशिष खोत, विकास साळुंखे, आदींचा समावेश होता.