पत्नीच्या विरहाने पतीची मुलासह आत्महत्या
By admin | Published: May 6, 2016 12:54 AM2016-05-06T00:54:13+5:302016-05-06T01:11:46+5:30
वळिवडेतील घटना : वर्षश्राद्धादिवशीच संपविली जीवनयात्रा
गांधीनगर : पत्नीच्या मृत्यूनंतर विरहाचे दु:ख सहन न झाल्याने पतीने मुलासह गळफास घेऊन पत्नीच्या वर्षश्राद्धादिवशीच आपली जीवनयात्रा संपविल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना गुरुवारी वळिवडे (ता. करवीर) येथे घडली. मोहन भालचंद्र चरेगावकर (वय ५१) आणि त्यांचा मुलगा विनायक (२१) अशी या पिता-पुत्रांची नावे आहेत. पत्नीच्या प्रतिमेचे पूजन करून तिच्या आठवणींच्या साक्षीनेच पतीसह या दोघांनी इहलोकीचा प्रवास संपविला.
याबाबत घटनास्थळ व गांधीनगर पोलिसांकडून (पान १० वर)
वडिलांसाठी शिक्षण थांबविले
मोहन आणि विनायक हे दोघेही मितभाषी. इतरांमध्ये जास्त मिसळणारे नव्हते. गेले वर्षभर हे पिता-पुत्र नेहमी एकत्र असायचे. विनायक हा अभ्यासात अतिशय हुशार होता. गतवर्षी डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमधून आयटी या विषयाची डिप्लोमा परीक्षा तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेशही मिळाला; परंतु आईचा मृत्यू झाल्याने वडील एकटे पडतील या भीतीने त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण थांबविले. कुटुंबाचा कणा असलेल्या आईच्या निधनाच्या दु:खातून हे दोघेही बाहेरच आले नाहीत. त्याच नैराश्यातून अखेर या दोघांनी जीवनयात्रा संपवली.
विरह सहन होईना म्हणून
चरेगावकर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘आमच्या आत्महत्येस कोणालाही दोषी धरू नये. आम्हाला विरह सहन होईना म्हणून आम्ही जीवन संपवत आहोत.’
हुशार विद्यार्थी
विनायक हा स्कॉलर विद्यार्थी होता. डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्याने संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्रीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, त्यात एक वर्षाचा खंड पडला. त्याने ‘विनू चरेगावकर योगा इन मराठी’ या स्वत:च्या अॅपची नोंदणी केली होती.