इतर परीक्षा होऊ शकतात, मग ‘एमपीएससी’ का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:24+5:302021-03-13T04:43:24+5:30

राज्यसेवेची परीक्षा ५ एप्रिलला होणार होती. कोरोनामुळे ती १३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यादिवशीच जेईई, नीटची परीक्षा होणार असल्याने महाराष्ट्र ...

There may be other exams, so why not MPSC? | इतर परीक्षा होऊ शकतात, मग ‘एमपीएससी’ का नाही?

इतर परीक्षा होऊ शकतात, मग ‘एमपीएससी’ का नाही?

Next

राज्यसेवेची परीक्षा ५ एप्रिलला होणार होती. कोरोनामुळे ती १३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यादिवशीच जेईई, नीटची परीक्षा होणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ही परीक्षा २० सप्टेंबरला घेण्याचे जाहीर केले. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती पुन्हा पुढे ढकलली आणि दि. ११ ऑक्टोबरला घेण्याची घोषणा सरकारने केली. पण, त्यानंतर १४ मार्चची तारीख जाहीर झाली. त्यानुसार ‘एमपीएससी’कडून तयारी करण्यात आली. राज्यसेवा परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रेही मिळाली होती. आता ७२ तासांवर परीक्षा आली असताना पुन्हा ती पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षार्थी नाराज झाले आहेत. परीक्षा पुढे गेल्याबद्दल कोल्हापुरातील परीक्षार्थींनी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

चौकट

परीक्षेची तयारी झाली होती पूर्ण

रविवारी होणाऱ्या पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रे कोल्हापूर केंद्रावरील सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. जिल्ह्यातील ४१ उपकेंद्रांची नावेही जाहीर केली होती. सर्व तयारी पूर्ण झाली होती.

चौकट

परीक्षा वारंवार पुढे गेल्यास मानसिकतेवर परिणाम

राज्यसेवेत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय तपासणी, नियुक्ती असे टप्पे आहेत. त्यांचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक होते. या परीक्षांची विद्यार्थी हे दोन ते तीन वर्षे आधी तयारी सुरू करतात. परीक्षा वारंवार पुढे गेल्यास त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो, असे मत स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. या परीक्षा आता पुन्हा पुढे गेल्याने वयोमर्यादेमुळे परीक्षा देण्याची अखेरची संधी असणाऱ्या परीक्षार्थींवर तणाव आला आहे.

प्रतिक्रिया

कोविड व्यवस्थापन, लॉकडाऊनच्या खेळखंडोबात विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लागत आहे. प्रचंड अभ्यास करून अचानक परीक्षा रद्द झाल्यावर राग येणे स्वाभाविक आहे. काहीही झाले, तरी अभ्यास सुरू ठेवा.

-अक्षय काजवे, कोल्हापूर.

देशात निवडणुका, राज्यात अधिवेशन घ्यायला चालते. मग, आमची परीक्षा का? नियोजित वेळेत होत नाही हे समजत नाही. सरकार आमचा विचार कधी करणार आहे.

-कपिल जठार, कोल्हापूर.

पॉईंटर

कोल्हापूर केंद्रावरील परीक्षार्थी : १४ हजार

उपकेंद्रांची संख्या : ४१

Web Title: There may be other exams, so why not MPSC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.