जिल्हा परिषद मुख्यालयातील तब्बल ८० जणांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:25+5:302021-08-26T04:27:25+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील तब्बल ८० कर्मचाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण सभेमध्ये तातडीने स्थानांतरणाच्या बदल्याची ग्वाही दिल्यानंतर ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील तब्बल ८० कर्मचाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण सभेमध्ये तातडीने स्थानांतरणाच्या बदल्याची ग्वाही दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रात्रीच बदल्यांच्या आदेशांवर सह्या केल्या. सकाळी जिल्हा परिषदेत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात बदल्यांचे आदेश मिळाले. सात, आठ वर्षे एकाच पदावर आणि एकाच विभागात ठिय्या मारलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
गेले काही दिवस स्थानांतरणाच्या बदल्यांचा विषय जिल्हा परिषदेत चर्चेत होता. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बदल्यांवरूनच वातावरण तापले होते. तेव्हा स्थानांतरणाच्या बदल्यांना विलंब का, अशी विचारणा सदस्यांनी केली होती. तेव्हाच लवकरात लवकर या बदल्या करण्याची ग्वाही संजयसिंह चव्हाण यांनी दिली होती. त्यानुसार चव्हाण यांनी मंगळवारी रात्रीच सामान्य प्रशासन विभागाकडून बदल्यांसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी मागवून घेतली. रात्री उशिरापर्यंत निर्णय घेऊन सकाळी आठ वाजल्यापासून सर्व ९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. सकाळी हे कर्मचारी जिल्हा परिषदेत आल्यानंतर त्यांना बदल्यांचे आदेश हातात देण्यात आले. ९९ पैकी १८ कर्मचारी हे १२ तालुक्यातून मुख्यालयात आले आहेत. ९९ पैकी १९ कर्मचारी हे वित्त विभागातील असून सामान्य प्रशासनातील ८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
चौकट
दिवसभर बदल्यांचीच चर्चा
बुधवारी दिवसभर या बदल्यांचीच चर्चा सुरू होती. कोण कोणत्या विभागात गेला, मला हा विभाग पाहिजे होता, तुला तो कसा मिळाला अशी चर्चा सुरू असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत पाहावयास मिळाले.