चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:38+5:302021-02-06T04:43:38+5:30
कोल्हापूर : कर्नाटकातून महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन पत्ता विचारण्याचा बहाणा करत अथवा पायी चालत जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावून (चेन स्नॅचिंग) ...
कोल्हापूर : कर्नाटकातून महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन पत्ता विचारण्याचा बहाणा करत अथवा पायी चालत जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावून (चेन स्नॅचिंग) नेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली.
या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून ९ जबरी चोऱ्यांमधील २२७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. चंद्रकांत महावीर माने (वय २६) व शक्ती सखाराम माने (१९, रा. माणकापूर, ता. चिकोडी, जिल्हा बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
-----------------------------------------------
मित्रांनीच केला मित्राचा खून
शिरोली : दारूची बाटली आणायला नकार दिला म्हणून अमित राठोड-नाईक (वय २२, रा. इंगळीकर काॅलनी, माळवाडी) या तरुणाचा समीर नदाफ (२०, रा. मराठी शाळेच्या शेजारी) व योगेश साखरे (२०, रा. पोवार मळा) या दोघांनी धारदार शस्त्राने भोसकून खून केला. आरोपींना शिरोली आणि गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
-----------------------------------------------
नगरसेवकाच्या तक्रारीवरून मिरजेत नागरिकांचे पाणी बंद
मिरज (जि. सांगली) : मिरजेत प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांच्या वादातून पाणी बंद करण्यात आले. नगरसेविकेच्या तक्रारीमुळे नागरिकांचे पाणी बंद करण्यात आल्याचा आरोप करीत योगेंद्र थोरात व नगरसेविका स्वाती पारधी यांनी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पाणीपुरवठा कार्यालयासमोर नागरिकांसह धरणे आंदोलन केले.
-----------------------------------------------
चोरट्याकडून आठ दुचाकी जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : साथीदाराने चोरी केलेल्या मोटारसायकलींची विक्री करताना खरसुंडी (ता. आटपाडी) येथील एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. प्रशांत शिवाजी कदम (वय ३३) असे संशयिताचे नाव आहे.
-----------------------------------------------
गावापर्यंत रस्ता पोहोचताच ग्रामस्थांचा आनंदोत्सव
चाफळ (जि. सातारा) : विभागातील बरीचशी गावे डोंगरमाथ्यावर वसलेली आहेत. त्यातीलच जंगलवाडी गाव. येथील ग्रामस्थांना रस्त्यासाठी पिढ्यान् पिढ्या वाट पाहावी लागली. मात्र, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर व मंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे काम मार्गी लागले आणि रस्ता गावापर्यंत पोहोचताच ग्रामस्थांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. देश स्वतंत्र झाल्यापासून जंगलवाडीकर रस्त्याच्या प्रतीक्षेत होते.
-----------------------------------------------
६८ हजाराची दारू जप्त
लांजा : तालुक्यातील कोर्ले येथे देशी - विदेशी दारूचा चोरटा व्यवसाय रत्नागिरीच्या गुन्हा अन्वेषण पथकाने उघड केला आहे. या धडक कारवाईत ६८ हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच येथे सुरू असलेल्या मटका अड्डयावर छापा टाकण्यात आला. यामध्ये रोख रक्कम व मटक्याचे साहित्य असा ३ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-----------------------------------------------
नगराध्यक्ष खेडेकरांवर ‘ॲट्राॅसिटी’ दाखल करा
खेड (जि. रत्नागिरी) : खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी विशेष घटक योजनेतून शासनाची आणि मागासवर्गीय जनतेची फसवणूक केल्याचा आरोप आरपीआयचे कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ, तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य दादा मर्चंडे यांनी खेडमध्ये पत्रकार परिषदेत केला. विकासक व स्वतःच्या फायद्यासाठी पूल बांधल्याप्रकरणी खेडेकर यांच्यावर ॲट्राॅसिटीअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा तसेच खर्च केलेली रक्कम वसूल करून शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-----------------------------------------------
बांदा ते दोडामार्ग मुख्य रस्ता अजूनही खड्ड्यांत
दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : दोडामार्गकडे जाणारा बांदा ते आयी रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत हरवला आहे. परिणामी सध्या दोडामार्गकडे जाणाऱ्या सर्वच गाड्या झारापवरून डिंगणे, गाळेल, नेतर्डेतून गोवा हद्दीतून दोडामार्गमध्ये जात आहेत. वाहनचालकांनी खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास करण्यापेक्षा गोव्यातील रस्त्यांचा मार्ग अवलंबिला आहे. हे जरी खरे असले तरी, महाराष्ट्र सरकारचे पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे या रस्त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष अधोरेखित करणारे आहे.
-----------------------------------------------
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७९३ घरकुलांना मंजुरी
सिंधुदुर्गनगरी : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी महाआवास अभियानअंतर्गत जिल्ह्यातील आणखी ४४ घरकुलांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७९३ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे, तर अजून ८ प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक दीपाली पाटील यांनी दिली.