अन् भंगारातील दुचाकी विनाप्रदूषण धावू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:13 AM2021-02-05T07:13:12+5:302021-02-05T07:13:12+5:30
कोल्हापूर : वाढते प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे पंधरा वर्षांवरील दुचाकी असो वा चारचाकी निश्चितच भंगारात जाणार आहेत. ही ...
कोल्हापूर : वाढते प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे पंधरा वर्षांवरील दुचाकी असो वा चारचाकी निश्चितच भंगारात जाणार आहेत. ही जाण ठेवून रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील महावितरणचे कनिष्ठ उपअभियंता अनिल घोडेस्वार यांनी आपली भंगारातील दुचाकी विनाप्रदूषित अशा बॅटरीवर रूपांतरित करीत पुन्हा रस्त्यावर आणली आहे. आता त्यांना या रूपांतरित दुचाकीला प्रादेशिक परिवहनच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने एप्रिल २०२१ पासून १५ वर्षांवरील वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सुमारे पावणेपाच लाख वाहने भंगारात जाणार आहेत. यात नागरिकांचे अब्जावधींचे नुकसान होणार आहे. हा विचार करून महावितरणमध्ये कनिष्ठ उपअभियंता असलेले रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील अनिल बाबूराव घोडेस्वार यांनी आपली पंधरा वर्षांपूर्वीची भंगार झालेली दुचाकी बॅटरीवर रूपांतरित करीत पुन्हा रस्त्यावर आणली आहे. ही गाडी आवाजरहित व विनाप्रदूषण चालते. यासाठी त्यांनी ५० हजार रुपये खर्च केले आहेत. ही दुचाकी कोणत्याही पद्धतीचे प्रदूषण करीत नसल्यामुळे त्याला शासनाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परवानगी द्यावी, अशी अपेक्षा घोडेस्वार यांनी व्यक्त केली आहे. यासोबत सायकलही तयार केली आहे. अशा पद्धतीने वाहने रूपांतरित केल्यानंतर रस्ते करासह अधिकचे लाभ द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दुचाकी अशी केली रूपांतरित
दुचाकीचे मेकॅनिकल इंजिन काढून त्या जागी ४८ व्होल्ट आणि ३६ ॲम्पियरची बॅटरी व एक हजार वॅटची मोटर मागील चाकामध्ये बसवली आहे. चार्जिंगचे किटही लावले असून, तीन ते चार तास बॅटरी चार्ज केल्यानंतर किमान ७५ कि.मी. अंतर दुचाकी पार करते. प्रतिकि.मी. ३६ पैसे इतका खर्च येतो, दीडशे किलोपर्यंतचे वजनही ही दुचाकी वाहू शकते.
कोट
अशा पद्धतीची दुचाकी करण्याचा प्रयत्न २०१२ पासून करीत होतो. मात्र, त्यासाठी लागणारे साहित्य मिळत नव्हते. परंतु आता ते उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे प्रदूषणविरहित वाहने कमी खर्चात रस्त्यावर येतील. शासनानेही याचा सकारात्मक विचार करावा.
- अनिल घोडेस्वार, कनिष्ठ उपअभियंता, महावितरण
फोटो : ३००१२०२१-कोल-मोटरसायकल०१
आेळी : अनिल घोडेस्वार यांनी भंगारातून विनाप्रदूषित तयार केलेली दुचाकी.
फोटो : ३००१२०२१-कोल-सायकल