उदगाव-जयसिंगपूर ओढ्याचा गाळ काढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:57+5:302021-08-26T04:25:57+5:30
उदगाव : उदगाव-जयसिंगपूर ते कृष्णा नदी अशा असलेल्या मोठ्या ओढ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा गाळ न काढल्याने पूर ...
उदगाव : उदगाव-जयसिंगपूर ते कृष्णा नदी अशा असलेल्या मोठ्या ओढ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा गाळ न काढल्याने पूर परिस्थितीमध्ये पाणी तुंबून राहत असल्याने रस्ते बंद होत आहेत. यावर शेतकऱ्यांनी आवाज उठविला होता. त्यासाठी उदगाव ग्रामपंचायतीकडून पालकमंत्री सतेज पाटील यांनी १ सप्टेंबरपासून गाळ काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये या ओढ्याचे प्राधान्याने काम सुरू करावे, असे निवेदन तहसीलदार अपर्णा मोरे यांना देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, जयसिंगपूर ते उदगाव कृष्णा नदीकाठापर्यंत ओढ्यातील गाळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. २०२१ च्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साठल्याने शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात त्याचे नुकसान होऊ नये म्हणून ओढ्यातील गाळ काढावा, खोलीकरण व रुंदीकरणाची मोहीम हाती घेऊन प्राधान्याने उदगावचा विचार करावा, असे म्हटले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही ओढ्यांचा गाळ काढणे, रुंदीकरण करणे यांवर वादळी चर्चा झाली होती. मोहीम सुरू झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार मोरे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच रमेश मगदूम, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - २५०८२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - उदगाव-जयसिंगपूर ओढ्याचा गाळ काढावा, या प्रश्नी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसरपंच रमेश मगदूम, जगन्नाथ पुजारी उपस्थित होते.